करोनाची पहिली लाट थांबली. दुसऱ्या लाटेचा प्रभाव अद्याप कायम आहे. तिसऱ्या लाटेबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून क्वचितच एखादे कुटुंब वाचले असेल. कुटुंबातील, नातेवाईक, मित्र परिवार, आप्तेष्ट, सहकारी यापैकी कोणी ना कोणीतरी करोनाचा बळी ठरला आहे.
जनतेला सहिष्णुतेचा सल्ला देणारे सरकार, नेते, हायकमांड हे कालांतराने एवढे निडर झाले की की बेड न मिळणे, डॉक्टरांची कमरता, सरकारी रुग्णालयात औषधांची टंचाई, ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्युमुखी पडणारे नागरिक याचा उल्लेख करताना त्यांचे मन थोडेही हेलावले गेले नाही.
एवढेच नाही तर करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासाठी कागदपत्र नाहीत आणि विशेष म्हणजे कोविडच्या कॉलमचाही त्यात समावेश नाही. देशातील कोणत्याही व्यक्तीने त्याच्या नातेवाईक किंवा आप्तेष्टाकडे कोविडने मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र असेल तर सांगावे.
आपल्याकडे भूकेने एखादी व्यक्ती दगावला तर त्या कारणाचे प्रमाणपत्र देणे अपशकुन आणि दंडनीय मानले जाते. उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह मुख्यमंत्री असताना कुशीनगर जिल्ह्यात एकाचा भूकेने मृत्यू झाला होता. त्यासंबंधी नोंद करण्यास तयार नव्हते.
आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर सरकारी दरबारी नोंद झाली. परंतु दुसरे कोणाचे सरकार असते तर भूकेने मृत्यू झाल्याचे मान्यच झाले नसते आणि तसा एफआयआर नोंदणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता.
करोनाचे संकट अजूनही संपलेले नाही आणि ते लवकरच संपेल असे वाटत नाही. वास्तविक सर्वच देशांत करोनाचा ग्राफ खाली-वर होत आहे. भारतही त्यास अपवाद नाही. सध्याच्या काळात करोनाचा ग्राफ हा बऱ्याच प्रमाणात खाली आहे. अनेक राज्यांनी निर्बंध मागे घेतले आहेत आणि व्यवहारात सवलत दिली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, पुढील बरेच दिवस ग्राफ हा जमिनीवरच राहील.
तज्ज्ञ मंडळींनी हा दिलासा काही दिवसांसाठीच ठरू शकतो, असे म्हटले आहे. अशावेळी पुढील लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच सर्वांनी तयारी करायला हवी. तीन आठवड्यांपासून ते तीन महिन्यांच्या काळात कधीही संसर्गाची लाट येऊ शकते, असा इशारा दिला आहे. सरकारकडून ऑक्सिजन पुरवठा आणि रुग्णालयातील बेडचे नियोजन केल्याचे दावे करण्यात आले आहेत. परंतु जनतेला संसर्गाच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी स्वत:च उपाय करावे लागतील.
करोना संसर्गाची तिसरी लाट आता कधीही येऊ शकते. तज्ज्ञांचे देखील याबाबत एकमत आहे. मात्र ती लाट कधी येणार, यावरून मतभिन्नता आहे. काही तज्ज्ञांनी पुढील लाटेचा अंदाज हा देशातील अनलॉकिंग आणि जनतेच्या वर्तणुकीवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या काळात जवळपास सर्वच राज्यात करोनामुळे लागू केलेले निर्बंध शिथिल आहेत. रस्त्यावर गर्दी उसळली आहे. बाजारात पुन्हा खरेदीचा माहोल निर्माण झाला आहे.
सध्याचे चित्र पाहता महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सच्या अंदाजानुसार येत्या दोन-चार आठवड्यांत मुंबईसह महाराष्ट्रात पुढची लाट येऊ शकते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार भारतात यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. या सर्वेक्षणात जगभरातील 40 डॉक्टर, शास्त्रज्ञ, व्हायरोलॉजिस्ट, संसर्ग विषाणू तज्ज्ञ आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.
त्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणाला शास्त्रीय आधार आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील भारताला तिसऱ्या लाटेपासून वाचवता येणार नाही, असे म्हटले आहे. ही लाट सहा ते आठ आठवड्याच्या आत दरवाजा ठोठावू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
संसर्गाच्या तावडीत आपण कधी आणि केव्हा सापडू, हे कोणीही सांगू शकत नाही. परंतु संसर्गाचा धोका कोणाला अधिक आहे, हे मात्र सांगता येऊ शकते. एका अंदाजानुसार जी मंडळी पहिल्या दोन लाटेत बाधित झाली ते अधिक सुरक्षित राहू शकतात. कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे.
अशावेळी ज्यांना आतापर्यंत बाधा झालेली नाही, त्यांना तिसऱ्या लाटेची जोखीम राहू शकते. आतापर्यंत मुलांवर संसर्गाचा फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे संसर्गाचा कोणताही म्युटेशन हा मुलांना ओढू शकतो. मुलांचे लसीकरण अद्याप न झाल्याने ही बाब महत्त्वाची ठरू शकते.
गेल्या एक-दीड वर्षांपासून करोनाच्या तडाख्यातून समाजातील गरीब घटक, कमी उत्पन्नातील घटक आणि अल्प मध्यम वर्गातील लोक या संसर्गापासून अलिप्त राहिले आहेत.
त्यामुळे या घटकांतील लोकांना देखील बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मंडळींना अद्याप लस मिळालेली नाही.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे जनजागृतीचा अभाव आणि गैरसमज. संसर्गाचा स्वभाव कसा राहील, हे कोणीही सांगू शकत नाही. बाधित व्यक्तींची इम्यूनिटी किती दिवस चालेल, हे देखील ठोसपणे सांगता येत नाही. त्यामुळे पहिल्या-दुसऱ्या लाटेत बाधा झाल्यानंतर पुढच्याही लाटेत त्यांना बाधा होणार नाही किंवा ते सुरक्षित राहतील, असे ठोसपणे सांगता येणार नाही.
करोना संसर्गाचे वेगवेगळे रूप समोर येत आहेत. करोना लाटेपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हे खूप मोठे शस्त्र आहे. लसीकरणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. चोवीस तासांत तब्बल 85 लाखाहून अधिक नागरिकांना डोस देण्यात आला आणि हा विक्रमच आहे. परंतु संसर्गाचे नवनवीन व्हेरियंट येत असताना लस कितपत प्रभावी ठरू शकते, हे देखील पाहिले पाहिजे. कारण लसीकरण झालेल्या नागरिकांनाही करोनाची बाधा झाल्याचे प्रकार घडले आहेत.
लसीकरणाचा विचार करताना आपण कोणत्या जिल्ह्यात राहतात हे देखील महत्त्वाचे आहे. त्यावरून लस मिळण्याची शक्यता कमी अधिक राहते. लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचा वेग सध्यातरी कमी आहे. काही जिल्ह्यांत तर केवळ तीन टक्केच लसीकरण झाले आहे. त्यातही त्यांना पहिलाच डोस मिळाला आहे. ही मोहीम 16 जानेवारीला सुरू झाली आहे. एकुणात सहा महिने लोटूनही लसीकरणाचा वेग कमीच दिसून येत आहे.
आरोग्य यंत्रणा, लशीचा तुटवडा, लशीवरून गैरसमज आदी कारणांमुळे लसीकरणात अडथळे आले आहेत. शेवटी तज्ज्ञांच्या मते व्यक्ती कोणत्याही वयोगटातील असो, त्याने करोना प्रोटोकॉलचे पालन करायला हवे. तरुण, वयस्कर, बाधित झालेले, लस घेतलेले या सर्व मंडळींनी प्राथमिक नियमांचे पालन करायला हवे. दुहेरी मास्क घालणे, सतत हात धुणे, गर्दीपासून दूर राहणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय करणे, यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे.
करोनापासून पसरलेल्या आजारावर आतापर्यंत ठोस औषध सापडलेले नाही. आतापर्यंत आयव्हरमेंकटिन, डोक्सिसिलिन, झिंक यांसारख्या औषधांनी उपचार केले जात होते आणि त्यालाही आता करोना उपचार प्रोटोकॉलमधून वगळले आहे. मल्टीव्हिटॅमिन देखील प्रोटोकॉलमधून बाजूला काढले आहे. अशावेळी एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्यावर घरातच उपचार होतील आणि ताप उतरण्याचे औषध दिले जाईल. याशिवाय खोकला आल्यास कफ सिरप दिले जाईल.
अर्थात रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली तर उपचार अधिक वेगाने करावे लागतील. आता तर ऍन्टीबॉडी कॉकटेल देखील नव्या व्हेरियंटमुळे फायदेशीर नसल्याचे सिद्ध झाले आहे. प्रोटोकॉलमधून औषधे वगळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे दुसऱ्या लाटेच्या काळात स्टेरॉइड आणि अन्य औषधांचा झालेला बेसुमार वापर. त्यामुळे रुग्णांची स्थिती अधिक शोचनिय झाली आणि त्यांना काळ्या बुरशीचा सामना करावा लागला.
फंगल इन्फेक्शनमागे रुग्णालयातून दिलेले ऑक्सिजन देखील कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या लाटेत आता गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी नवीन प्रोटोकॉल काय असेल, ऑक्सिजन देताना कोणती खबरदारी घेतली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. रुग्णांवर अनेक प्रकारच्या औषधांचे प्रयोग करण्यात आले आणि पुढेही असाच प्रकार सुरू राहू शकतो. म्हणूनच बचाव हाच एकमेव उपचार आहे.
-योगेश मिश्र