माजी ऑलिम्पिकपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पी. टी. उषा यांची भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आता खुद्द उषाच निवड समितीवर आल्यामुळे येत्या काळात तिच्या मार्गदर्शनाखाली देशाला नवनवे पदक विजेते खेळाडू मिळतील असा विश्वास वाटतो.
ऑलिम्पिक पदकाने काही क्षणांच्या फरकाने हुलकावणी दिली असली तरीही उषा आता रत्नपारखी या नव्या भूमिकेत असल्याने तिच्याकडूनच प्रेरणा घेत देशाला ऑलिम्पिक स्टार गवसतील अशी अपेक्षाही आहे. उषाने आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची रास ओतली आहे. तिच्या कामगिरीमुळेच तिला “पायोली एक्सप्रेस’ असे संबोधण्यात येते. तसेच ऑलिम्पिक वगळता अन्य स्पर्धांमध्ये तिने जे सुवर्णयश मिळवले त्यावरून तिचा उल्लेख “सुवर्णकन्या’ असा होतो. उषा स्कूल ऑफ ऍथलेटिक्स या आपल्या अकादमीच्या माध्यमातून तिने सातत्याने सरस खेळाडू देशाला दिले आहेत. आता तिची भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने कनिष्ठ गटाच्या निवड समितीची अध्यक्ष केल्यामुळे तिच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आता ती केवळ प्रशिक्षक याच भूमीकेत नसून तिच्या हाती देशाचे ऍथलेटिक्समधील भविष्यही आहे.
आज वयाच्या 56 व्या वर्षीही तिची तंदुरुस्ती नवोदित खेळाडूंनाही लाजवेल अशी आहे. मिल्खासिंग, शायनी अब्राहम यांच्यानंतरच्या काळात आपल्या नावाचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करणारी उषा आता आगामी काळात ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी सज्ज बनली आहे. भारताला ऍथलेटिक्समध्ये देदीप्यमान परंपरा आहे. मिल्खासिंगपासून ते आताच्या हिमा दासपर्यंत अनेक खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. खुद्द उषाचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत हिमा दास सातत्याने यश मिळवत आहे.
1980 च्या दशकात जागतिक स्तरावर कोणतीही स्पर्धा असली तरी त्यात उषाचेच वर्चस्व राहिले आहे. तिने “ट्रॅक ऍण्ड फिल्ड’मध्ये या दशकात एकूण 23 पदके मिळवली. त्यात 14 सुवर्णपदके असून तिच्या केवळ सहभागामुळेच अनेक खेळाडूंवर दडपण येत होते. तो काळ जागतिक ऍथलेटिक्समध्ये “उषःकाल’ होता. वयाच्या केवळ नवव्या वर्षीच तिने मैदानी स्पर्धा गाजवायला सुरुवात केली तेव्हाच तिच्याकडे ऑलिम्पिक पदक पटकावण्याची क्षमता असल्याचे दिसून आले. या पदकाची स्वप्नपूर्ती करण्यात जरी तिला अपयश आले असले तरीही तिने देशाला जागतिक वर्चस्व प्राप्त करून दिले हे कोणीही नाकारणार नाही.
ज्या काळात ती खेळत होती, तो काळ अद्ययावत सुविधा किंवा सरावासाठी विविध देशांचे दौरे वगैरेचा नव्हता. कदाचित परवडत नव्हते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. त्यावेळी भारतीय क्रीडा क्षेत्र अत्यंत दुर्लक्षित होते व भारतातील क्रीडा क्षेत्र म्हणजे पहिले क्रिकेट व दुसरे हॉकी या दोनच खेळांवर संपायचे. त्या काळात ऍथलेटिक्सला ना लोकाश्रय होता ना राजाश्रय. त्यामुळे अत्यंत अपुरी व्यवस्था व तोकड्या सुविधा असतानाही उषाने जी कारकीर्द उभी केली ती आजही अविश्वसनिय वाटते.