लॉकडाऊन काळात, काहीतरी क्रिएटिव्ह करावे म्हणून मी अनेक उपक्रम केले. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे मी काही कथांचे वाचन करून ते सोशल मीडियावर टाकले. माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर असल्याने मला जंगल, वन्य जीवन, शिकार कथा यांचं प्रचंड आकर्षण. त्यामुळे जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन, भानू शिरधनकार, व्यंकटेश माडगूळकर यांची बरीच पुस्तके वाचून काढली. त्यात केनेथ अँडरसन आणि जिम कॉर्बेट यांच्यातील तुलनात्मक साम्य व भेद सांगणारा एक लेख मी ऑडियो स्वरूपात टाकला.
अर्थात मी जेव्हा हे सगळं करतो तेव्हा पार्श्वसंगीताचा अचूक वापर करून, वातावरण निर्मिती करतो आणि श्रोत्यांना खिळवून ठेवतो. तो ऑडियो प्रसिद्ध होताच सोशल साइटवरच्या माझ्या इनबॉक्समध्ये मला मेसेज आला, “प्लिज कॉल, माय नंबर …’ मी माझ्या सवडीप्रमाणे फोन केला. कुणीतरी बडा, आर्मी ऑफिसर होता व साताऱ्यात आता मोठ्या बंगल्यात सुखा समाधानाने निवृत्त जीवन जगत होता. मी फोन करताच, त्यांनी (अहो-जाओ करत) ऑडियो आवडल्याचे सांगून, माझी बोळवण केली. आणि आपली कहाणी सुरू केली, त्यांचं पूर्ण आयुष्य, मग कुठे कुठे पोस्टिंग झालं, त्यानंतर बंगलोरला असताना, त्यांना कसं केनेथ अँडरसनच्या शिकार कथांचं वेड लागलं, त्यानंतर केनेथचा मुलगा डॉन याच्यासोबत राहाणारे एक गृहस्थ त्यांच्या परिचयात कसे आले, मग दोघांनी मिळून एक पुस्तक लिहायचा संकल्प सोडल्याचे सांगितलं.
केनेथची संपूर्ण जीवन गाथा तर सांगितली, तसेच त्याच्या किती पत्नी होत्या, नंतर कुठे कुठे त्यांचे वास्तव्य होते, त्यांचा अंत कसा झाला.
डॉनने नंतर काय काय उद्योग केले, त्याची जीवनशैली कशी होती, त्याचा अंत कसा झाला. त्यापैकी बऱ्याच ठिकाणाला त्यांनी स्वतः भेट दिली होती.
ते गृहस्थ अगदी पोटतिडकेने ती सर्व हकीकत सांगत होते आणि त्याच्या सत्यतेविषयी माझ्या मनात बिलकुल शंका नव्हती, इतकं ते निखालस होतं.
मी अधूनमधून अरे वा, सुरेख, क्या बात, बाप रे, अरे देवा, तुम्ही ग्रेट आहात, एवढ्या पुरताच संभाषणात होतो. मला वाटलं की त्यांचं सगळं सांगून झालं की मला बोलू देतील, माझ्याबद्दल विचारतील.
मी एवढं म्हटलं, पण फोनवर बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटू, मला खूप आवडेल तुमच्या समोर बसून इथंभूत गप्पा मारायला. हो हो जरूर, बर ठीक आहे असं म्हणून त्यांनी फोन ठेवून मला धक्का दिला. मी जे काही बोलायचं ठरवलं होत, ते मनातच राहीलं. मनात म्हटलं, अर्जंट काही काम आलं असेल, तर आपल्याकडे त्यांचा नंबर आहे, मी तो प्रकर्षाने केनेथ जोशी, असा सेव्ह केला. मी केलेल्या काही ऑडियोच्या लिंक दिल्या व त्यावर प्रतिक्रिया मागवल्या. “ऐकल्यावर जरूर देतो’ एवढा माफक रिप्लाय आला. त्यानंतर आज सहा महिने झाले, त्यांच्याकडून काही म्हणजे काही संपर्क नाही.
कितीही मनाला समजावले तरी हे कुठे तरी खटकलेच, हल्ली माणसांची मन मोकळं करण्याची गळचेपी होते व संधी मिळताच त्याचा निचरा करायची गरज असते हे जरी खरे असले तरी ती तशी सर्वांचीच असते, नाही का? समोरच्याला गृहीत धरणे किती बरोबर आहे?
अनुराधा पवार