एखाद्या व्यक्तीला, तिच्या कार्याला आपण लांबून पाहत असतो तेव्हा तिच्याबद्दलची चांगली प्रतिमा तयार होते; मात्र प्रत्यक्ष जवळ गेल्यानंतर त्या प्रतिमेला तडे जातात, असं अनेकदा घडतं. बाबासाहेबांच्या बाबतीत माझं बरोबर उलटं झालं. लांबून त्यांच्याकडून “शिवचरित्र’ ऐकताना, त्यांनी लिहिलेलं “शिवचरित्र’ वाचताना, “जाणता राजा’ हे महानाट्य पाहताना मनात जी बाबासाहेबांची प्रतिमा तयार झाली होती, ती त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाल्यानंतर, त्यांचा सहवास लाभल्यानंतर, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद लाभल्यानंतर आणखी उजळली. समाजातल्या अनेक निःस्वार्थ कामांना तितक्याच निःस्वार्थपणे प्रचंड मदत करणारे बाबासाहेबसुद्धा जवळून दिसले.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नाव जेव्हा समोर येतं, तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो सह्याद्रीचा बेलाग आणि अजिंक्य कडा! महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा विचार जेव्हा डोक्यात येतो, तेव्हा समोर दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अजिंक्य किल्ला! आपण सह्याद्रीकडून जशी निर्भयता आणि स्वतंत्र वृत्ती शिकतो, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून देशासाठी लढण्याची प्रेरणा घेतो, तसं बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची आठवण झाल्यावर होतं.
इयत्ता चौथीतून पाचवीत जाताना मी बाबासाहेबांचं “राजा शिवछत्रपती’ पहिल्यांदा वाचलं. ते वाचून आता अर्ध्या शतकाहून अधिक काळ लोटला, तरीही अजून “राजा शिवछत्रपती’ची जादू मनावरून उतरलेली नाही. शिवाजी महाराजांचं हे चरित्र हाती लागलं आणि खाली न ठेवता ते झपाटल्यासारखं वाचून पूर्ण केलं, हे आजही माझ्या लक्षात आहे. एक प्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांची संगत, त्यांचं मार्गदर्शन तिथून चालू झालं.
पुढचं शिक्षण मी इतिहास विषयात घेतलं. त्यावेळी मराठ्यांचा इतिहास अभ्यासाला होताच. त्या अभ्यासातून मराठ्यांच्या इतिहासाविषयी मनात अभिमान निर्माण झाला. इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतानासुद्धा वेळोवेळी “राजा शिवछत्रपती’ पुन्हा-पुन्हा वाचत राहिलो. त्यातून शिवाजी महाराजांच्या अथांग व्यक्तिमत्त्वाचे नवनवे अर्थ, वेळोवेळी सापडत गेले, अजूनही सापडतात.
आयएएस होण्यापूर्वीच्या वर्षांमध्ये “पूर्ण वेळचा कार्यकर्ता’ म्हणून समाजात वावरत होतो. त्या वर्षांमध्ये बाबासाहेबांच्या “शिवचरित्र’ व्याख्यानमाला ऐकल्या. त्या रात्रीच्या वेळी होत असत. तेव्हा रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानाकडं अक्षरशः हजारो नागरिकांचे थवे व्याख्यानासाठी निघालेले असायचे. बाबासाहेबांची शिस्त, त्यांच्या वक्तशीरपणाला अनुसरून, ठरलेल्या वेळी व्याख्यान सुरू व्हायचं. त्याआधी लोकं स्थानापन्न झालेली असायची.
शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या सदोदित आणि अफाट अभ्यासामुळे भारावलेलं बाबासाहेबांचं देखणं व्यक्तिमत्त्व. बाबासाहेब जेव्हा अत्यंत तपशिलात जाऊन “शिवचरित्र’ सांगत असत, तेव्हा आम्ही ऐकणारे “शिवकालात’ जात असू, साक्षात शिवाजी महाराज समोर उभे ठाकत असत. काही वर्षांनंतर बाबासाहेबांनी “जाणता राजा’ हे महानाट्य रंगमंचावर आणलं.
जगाच्या नाटकाच्या इतिहासातलं हे क्रमांक दोनचं सर्वात मोठं, खुल्या रंगमंचावर केलं जाणारं नाटक. त्या निमित्तानं शिवाजी महाराज आणि शिवकाल डोळ्यासमोर उभे राहिले. “शिवकालात’ लोक कपडे कसे घालत असत, कसे बोलत असत, इथंपासून ते संगीत, लोकसंगीत, पोवाडा, ओवी, अभंग या सर्व परंपरेसहित साक्षात शिवकालीन महाराष्ट्र समोर उभा राहत असे.
या काळात मग बाबासाहेबांशी ओळख झाली. एखाद्या व्यक्तीला, तिच्या कार्याला आपण लांबून पाहत असतो तेव्हा तिच्याबद्दलची चांगली प्रतिमा तयार होते; मात्र प्रत्यक्ष जवळ गेल्यानंतर त्या प्रतिमेला तडे जातात, असं अनेकदा घडतं. बाबासाहेबांच्या बाबतीत माझं बरोबर उलटं झालं. लांबून त्यांच्याकडून “शिवचरित्र’ ऐकताना, त्यांनी लिहिलेलं “शिवचरित्र’ वाचताना, “जाणता राजा’ हे महानाट्य पाहताना मनात जी बाबासाहेबांची प्रतिमा तयार झाली होती, ती त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाल्यानंतर, त्यांचा सहवास लाभल्यानंतर, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद लाभल्यानंतर आणखी उजळली.
समाजातल्या अनेक निःस्वार्थ कामांना तितक्याच निःस्वार्थपणे प्रचंड मदत करणारे बाबासाहेबसुद्धा जवळून दिसले. त्यांनी विविध सामाजिक कामांना अक्षरशः कोट्यवधी रुपये उभारण्यास मदत केली असेल. पण कुठंही स्वतःच्या नावाचा आग्रहसुद्धा त्यांनी धरला नाही. बाबासाहेबांची अशी मदत ज्यांना मिळाली, त्यात अर्थातच चाणक्य मंडल परिवार आहे. एके वेळी त्यांनी “जाणता राजा’चे दहा प्रयोग, मी हाती घेतलेल्या छोट्याशा शैक्षणिक कामाला आर्थिक मदत म्हणून दिले होते. या मदतीच्या निरपेक्ष बाबासाहेबांबद्दल माझ्या मनात नितांत कृतज्ञता आहे, ती शाश्वत आहे.
मला वाटतं की बाबासाहेबांनी लिहिलेलं “शिवचरित्र’ आणि महानाट्य “जाणता राजा’ यांचं इंग्रजीसहित भारतातल्या आणि जगातल्या इतर भाषांमध्येदेखील भाषांतर व्हायला हवं. शिवाजी महाराज हे केवळ एका विशिष्ट प्रदेशाचे, एका विशिष्ट भाषेचे, प्रेमानंच पण थोडंसं मोकळेपणानं म्हणतो- एका विशिष्ट जातीचे नेता नाहीत. शिवाजी महाराज हे मानवी इतिहासातलं एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे, कार्य आहे.
शिवाजी महाराज विश्ववंद्य आहेत. संपूर्ण भारताचे ते राष्ट्रपुरुष आहेत. शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रेरणेतून पुढे आकाराला आलेला मराठ्यांचा इतिहास हा संपूर्ण भारताचा देदीप्यमान वारसा आहे. खरं म्हणजे, तशी मांडणी महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतांमध्येदेखील व्हायला हवी. महाराष्ट्राबाहेरच्या विद्यापीठांमध्ये शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा.
असा अभ्यास चालू राहणे, मराठ्यांचा इतिहास म्हणजे आपले सर्वांचे पूर्वज या भारतमातेसाठी लढले, अशी शास्त्रशुद्ध मांडणी करणे आणि आपल्या परीनं आजही भारतमातेसाठी असेच कार्य करत राहणे, म्हणजे बाबासाहेबांचे आशीर्वाद घेतल्यासारखं आहे. बाबासाहेबांच्या जाण्यानं झालेले दुःख तीव्र आहे. यानिमित्ताने आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास, अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर नेण्याच्या कामाला लागूयात, अशी प्रार्थना करतो.
– अविनाश धर्माधिकारी,
माजी सनदी अधिकारी