एका शहरात एका नामांकित डॉक्टरांचा दवाखाना होता. डॉक्टर अतिशय हुशार आणि विद्वान होते. एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याची किमया अशी त्यांची ख्याती होती. अनेक आजारी रुग्णांना त्यांनी आपल्या उपचाराने बरे केले होते. त्या डॉक्टरांचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्ये होते आणि ते म्हणजे गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांकडून ते एक फॉर्म भरून घेत असत. त्या फॉर्ममध्ये लिहिलेले असे की, जर आपण या व्याधीतून सहीसलामत सुटलात आणि तुम्हाला जगण्याचा आणखी एक चान्स मिळाला तर तुम्ही काय कराल?
त्यांच्या या फॉर्ममधील प्रश्नावर रुग्ण काही वाक्ये लिहीत असत. जी काही प्रमाणात एकाच अर्थाने प्रेरित असत. ती वाक्ये म्हणजे
– जर मी वाचलो तर माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ व्यस्त करेल.
– आमच्या घरातील मुलांसोबत लहान होऊन आनंदाने खेळेल.- माझ्या राहिलेल्या इच्छा जसे की पर्यटन, समाजसेवा, छंद पूर्ण करेल.
– जी माणसे माझ्या वागण्या बोलण्यातून दुखावली असतील त्यांची मोठ्या मानाने माफी मागेल. राग, क्रोध, अहंकार, लोभ याचा त्याग करेल.
– उर्वरित आयुष्यात अधिकाधिक आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करेल.
– आयुष्याबाबत कधीही तक्रारी करणार नाही. किंबहुना कुणालाही माझ्याबाबत तक्रार करू देणार नाही.
अशा पद्धतीची अनेक वाक्ये त्यात लिहिलेली असत. जेव्हा ऑपरेशन किंवा उपचारानंतर ती व्यक्ती घरी जात असे, तेव्हा डॉक्टर तो फॉर्म त्यांना देत असे. तसेच या फॉर्ममधील किती गोष्टी पूर्ण केल्या याची नोंद ठेवण्याचा सल्लाही डॉक्टर देत असत. अनेक रुग्ण त्या फॉर्ममधील पूर्ण केलेल्या गोष्टींचा अभिप्राय डॉक्टरांना भेटून देत असत.
या सर्वातून एक गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आली होती, ती म्हणजे जीवनाने दुसऱ्यांदा जगण्याची संधी दिली असता लोक असेच काही लिहीत असत. त्यापैकी कोणीही कधीही-
– मला बदला पूर्ण करायचा आहे
– अजून संपत्ती कमवायची आहे
– शत्रूला मारायचे आहे
– पुन्हा पूर्वीप्रमाणेच जीवन जगायचे आहे
असे कोणीही लिहीत नसे. याचे कारणही तसेच होते आणि ते म्हणजे एकदा जीवनाने धडा शिकविला की, दुसऱ्यांदा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.
सध्याचे जीवन ही जणू एक स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येकाला आपल्या स्वार्थासाठी नुसतेच धावायचे आहे. परंतु या धावण्यातून आपण जीवन जगायचे कसे हेच विसरत चाललो आहोत. तारुण्याच्या वयात आपण नेहमी कामातच व्यस्त राहतो. कधी ओव्हरटाइम करून, तर कधी काही जास्तीचे काम करून सतत जास्तीतजास्त पैसे कसे मिळवता येतील यासाठीच प्रयत्न करतो.
अर्थात हे सगळं आपण आपल्या परिवारासाठीच करतो. पण हे करताना आपण स्वत:ला वेळ, विश्वास, सहवास, आदर आणि आनंद देतो का? साध्या साध्या गोष्टींत लपलेला अनमोल आनंद जपतो का? याचे उत्तर शोधले पाहिजे.
जबाबदारीच्या ओझ्याखाली
राहूनच गेलं जगायचं
स्वर्गापरी सुंदर जीवन
मनमुरादपणे बघायचं
अशी काहीशी अवस्था आपली झाली आहे. आपले दुर्दैव म्हणजे आयुष्याने दुसरी संधी दिली तरच आपण याबाबत जागृत होतो; परंतु जीवनाने दुसरी संधी दिलीच नाही तर? याचा विचार आपण करतो का, याचे आत्मपरीक्षण आपण करायला हवे.
एकदा एका गरीब माणसाने राजाकडे कसायला थोडीशी जमीन मागितली. राजा म्हणाला, सूर्योदयानंतर तू जेवढे चालू शकशील, धावू शकशील तेवढी जमीन तुझी. परंतु एक लक्षात ठेव, तू ज्या ठिकाणाहून धावणे सुरू करशील त्याच ठिकाणी सूर्यास्तापर्यंत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही!
तो माणूस खूश झाला. अन् सकाळी
सूर्योदय होताच पळायला लागला. पळत राहिला; त्याने धावायचं थांबवले नाही. अजून थोडी मेहनत. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती या विचाराने धावत राहिला. सायंकाळ झाली मागे वळून पाहतो तर खूप लांबचा पल्ला गाठयचा होता. आता सूर्यास्तापर्यंत कसे पोहोचणार या चिंतेत धावू लागला आणि धावता धावता दमछाक होऊन खाली कोसळून मरण पावला. राजा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, याला फक्त सात फूट जमीन हवी होती.
बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता! रिकाम्या हाताने आला होता रिकाम्या हातानेच गेला.आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेवून विचार करा. आपण पण तीच चूक तर करीत नाही ना? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असिमीत प्रचंड आणि अफाट आहेत! अन् या मोहात आपण जगण्याचा अर्थच विसरून जातो. जेव्हा जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.आपल्याकडे काहीही वेळ ना काळ शिल्लक राहात नाही. मोहापोटी आपण पूर्ण सर्वस्व गमावून बसतो.
खरं तर प्रत्येकाला पुन्हा जीवनदान देणारा देवदूत मिळेलच असे नाही. म्हणून दुसऱ्या संधीनंतर सुरुवात करण्यापेक्षा मिळालेल्या आयुष्याचे सोने करा. कामं तर प्रत्येकालाच आहेत त्यातून आपल्यांना वेळ द्या. सुखापेक्षा समाधान मिळवा. नको शत्रू, नको दु:स्वास अन् नको तो स्वार्थ. रागलोभाच्या पलीकडे एक तृप्त, प्रशांत जगायला शिका.
जे वेळीच मागे वळले
जीवन त्यांना कळले…
सागर ननावरे