आपण “पुराणातली वांगी पुराणात’ हा वाक्प्रचार अनेकदा ऐकला असेल. मुळात या वाक्प्रचारात “वांगी’ असा शब्द नसून “वानगी’ म्हणजे नमुना किंवा उदाहरण असा होता. अपभ्रंश होऊन वांगी तिथं जाऊन बसली. याचा अर्थ जे काही ज्या संदर्भात ऐकलं/पाहिलं असेल ते त्या संदर्भापुरतंच ठेवायचं. याचं कारण असं असावं की, पुराणातील बोधप्रद कथांमधील चांगल्या व्यक्ती या आदर्श असतात, पण व्यवहारात असा चांगुलपणा दाखवून उपयोग नसतो. तिथे पुराणाऐवजी पंचतंत्रातील गोष्टींप्रमाणे “जशास तसे’ किंवा “शठं प्रति शाठ्यं’ असाच प्रतिसाद उचित ठरतो.
गंमत अशी की आपण “बोले तैसा चाले’ ज्याला इंग्रजीत “वॉक द टॉक’ असं म्हणतात त्या प्रकारच्या वागण्याचीही अपेक्षा करतो. अशी माणसं समाजात अभावानंच आढळतात. अनेक विद्वान आणि प्रतिष्ठित माणसं आपल्या उपदेशामधून आणि भाषणातून चांगल्या वागणुकीचा आग्रह धरतात. मात्र प्रत्यक्षात विपरीत कृती करताना आढळून येतात.
माझ्या माहितीचे एक गृहस्थ होते त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन कारावास भोगला होता. नंतर ते सामाजिक सुधारणांसाठी भाषणं देऊन जागृती करीत होते. जेव्हा त्यांच्या मुलासाठी उपवर मुलींच्या पालकांचे प्रस्ताव येऊ लागले. तेव्हा आपल्या भाषणातील उपदेश साफ विसरून जाऊन त्यांनी जबरदस्त हुंड्याची मागणी तर केलीच पण स्त्रियांशी आदरानं वागणं शिकवणाऱ्या या सद्गृहस्थांची (!) मजल उपवर मुलीच्या केसांची लांबी फूटपट्टीनं मोजण्यापर्यंत गेली! पुढे केव्हातरी त्यांच्या वागण्याबद्दल एकानं प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांचं उत्तर तयार होतं- पुराणातली वांगी पुराणात!
आपल्या भाषेनं परस्परविरुद्ध वर्तणुकीला आधारभूत वाक्प्रचार दिल्यानं मोठीच सोय झाली आहे. जे बोलल्याप्रमाणे वागतात त्यांच्यासाठी “बोले तैसा चाले’ आणि ज्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो त्यांच्यासाठी “पुराणातील वांगी’!
सामान्यांची समाजसुधारक व्यक्तींकडून आणि नेत्यांकडून “बोले तैसा चाले’ अशी अपेक्षा असते. असं वागणाऱ्या काही व्यक्ती अपवादानंच आढळतात. मराठी भाषेचा आग्रह धरणारे खुशाल आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालताना आढळून येतात. दारूबंदीसाठी आग्रही असणारे अनेकदा संध्याकाळी शांभवीची आराधना करताना दिसतात.
चारित्र्याचे पाठ देणारे काही धर्मगुरू तर कोवळ्या मुला-मुलींनाही आपलं भक्ष्य बनवतात. या सगळ्यांना “पुराणातील वांगी पुराणात’ या वाक्प्रचारानं जणू लायसेन्सच देऊन टाकलं आहे की काय, असं वाटू लागतं.
नेतेमंडळींना तर पुराणातली वांगी वरदानच आहे. प्रचारात मोफत वीज, 24 तास पाणी, किफायतशीर आरोग्यसेवा, निवृत्त कलाकारांना/खेळाडूंना पेन्शन अशी भरघोस आश्वासनं ते देतात. पण खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर ती भाषणातली आश्वासनं म्हणजे पुराणातील वांगीच ठरतात! याच्यापुढील पायरी म्हणजे मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले पुढारी. कुणी भलतीच (म्हणजे विषयाशी सुतराम संबंध नसलेली) व्यक्ती मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचं फुसकं आश्वासन देते आणि “आमरण’ उपोषण एका मोसंबीच्या रसाच्या प्यालानिशी संपतं!
“वचने किं दरिद्रता’ या न्यायानं आपण बऱ्याच गोष्टी कुणाकुणाला कबूल करून (विशेषत: पैज लावल्यावर) बसतो आणि “इम्तिहान के वक्तपर’ फडतूस कारण सांगून जबाबदारीतून निसटतो.
मला एकदा पुराणातल्या वांग्यांचा असाच अनुभव आला. एका मोठ्या कंपनीत मी सल्लागार म्हणून काम करीत होतो. एका विदेशी ग्राहक कंपनीचा मोठा आणि प्रतिष्ठेचा प्रकल्प अगदी थोड्या काळात पूर्ण करायचा होता.
माझ्या कंपनीला अशा कामाचा अनुभव शून्य होता. माझ्या जबाबदारीवर तो प्रकल्प हाती घेण्यात आला. माझी फी व्यवस्थापनानं मान्यही केली. ग्राहक कंपनीलाही प्रकल्प दिलेल्या वेळात पूर्ण होणार नाही अशी खात्री वाटत होती. माझ्या कंपनीच्या उपाध्यक्षांनी हे काम वेळेत पूर्ण झालं तर फीएवढीच रक्कम बोनस म्हणून देईन असं मला तोंडी सांगितलं. प्रकल्प यशस्वी रीत्या पूर्ण झाला. पण नंतर उपाध्यक्षांनी अरे, ते मी तुला गमतीत सांगितलं होतं असं म्हणून माझी बोळवण केली! तेव्हा आपल्या सर्वांना कुठं ना कुठं तरी पुराणातली वांगी चाखायला मिळतात हे नक्की!
– श्रीनिवास शारंगपाणी