एका गावात एक शेतकरी राहात होता. त्याच्या गोठ्यात गायी, बैल होते. दारात मोत्या कुत्रा होता. कोंबड्या पाळलेल्या होत्या. शिवाय शेजारीच असलेल्या त्यांच्या रानात ससा, शेळ्या, मांजर असे सगळे राहात होते.
कधीकधी गावाच्या नदीपलीकडून एखादा बिबट्यादेखील येत असे. त्याच रानात एक उंदरीण राहात होती. तिला चार पिल्लं होती. सगळ्यात धाकट्या पिलाचं नाव होतं पिट्या. हा भारी द्वाड होता. सगळ्यांच्या खोड्या काढत असे. त्याला पुष्कळ वेळा आई सांगत असे की, “अरे, सांभाळून वागत जा. आपण अगदी लहान आहोत. मांजरापासून तर फार सावध राहात जा. त्याच्या आसपाससुद्धा फिरकत जाऊ नकोस.’ पण हा कुठला ऐकायला!
शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये गुरांसाठी बराच कडबा, धान्य ठेवलेलं असे. ही उंदीर मंडळी नेहमी तिथं जात आणि त्यातलं धान्य घेऊन खात असत. कधीकधी स्वयंपाकघरात ठेवलेलं खोबरं, थालिपीठ असे चविष्ट पदार्थ मिळाले, तर तेही पळवीत. एकदा अशीच पिट्याची आई आपल्या चार पिल्लांना घेऊन गोठ्यात खायला आली. बैल नुकतेच रानातून घरी आले होते. दमले होते. त्यातला एक ढवळ्या नावाचा बैल पोटभर खाऊन जमिनीवर बसला होता. त्याला मधूनच पेंग येत होती. पिट्याची आई आणि तीन पिल्लांनी भराभर खाऊन घेतले.
जमेल तेवढे तोंडात घेतले आणि आपल्या घरी परतली. घरी आल्यावर लक्षात आलं की, अरेच्या, पिट्या तर आलाच नाही आपल्याबरोबर. “आता याला कुठं बाई शोधायचं… अंधार पडायला लागला.’ आई काळजीनं म्हणाली. पिट्याची बहीण म्हणाली, “बसला असेल कुठंतरी खेळत. सगळ्यांच्या खोड्या काढून झाल्या की येईल घरी!’
तेवढ्यात पिट्या घाईघाईनं बिळात शिरला. “मला वाटलंच,’ त्याचा भाऊ म्हणाला, “कुणाची तरी खोडी काढून आलास ना?’ पिट्या म्हणाला, “बाहेर बघ गंमत!’ आईनं हळूच बाहेर डोकावून बघितलं तर काय… एक भलामोठा बैल बिळाच्या बाहेर येऊन त्यांच्या बिळाच्या भिंतीला जोरजोरात धडका देत होता. आई आणि सारी पिल्लं अगदी घाबरून गेली. पिट्या आतून ओरडला, “बैलोबा, तुम्ही कितीही धडका मारा.
तुम्ही काही बिळातून आत येऊ शकणार नाही आणि ही भिंतही पाडू शकणार नाही. तुमचंच डोकं फुटेल.’ आणि पुन्हा हसू लागला. बैल बिचारा थोड्या वेळानं निघून गेला. यानंतर तर या आगाऊ पिट्याचा व्रात्यपणा फारच वाढला. त्याला वाटलं, आपण कोणत्याही प्राण्याला वाट्टेल तेवढा त्रास दिला तरी ते आपल्याला काहीही करू शकणार नाहीत.
मग एके दिवशी काय झालं, शेतापलीकडच्या दाट झाडीतून बिबट्या यांच्या रानात आला. पाटातून पाणी वहात होतं. त्याला लागली होती तहान. बिबट्या पोटभर पाणी प्याला आणि मग तो तिथंच जरा लवंडला. पिट्याचं इकडून तिकडं उंडारणं चालूच होतं. त्याचं अचानक झोपलेल्या बिबट्याकडे लक्ष गेलं. हा प्राणी तर पिट्यानं कधीच पाहिला नव्हता. त्याला बिबट्या फार आवडला. त्याची ती सुंदर कांती, अंगावरचे ठिपके… पिट्या त्या बिबट्याच्या जवळ गेला.
बिबट्या गाढ झोपेत होता. मग काय… पिट्या खुशाल त्याच्या पाठीवर, पोटावर फिरू लागला. त्याच्या शेपटीवरून घसरगुंडी खेळू लागला. तो आपल्याला काही करत नाही असं पाहून पिट्या त्याच्या मिशा ओढू लागल्या. बिबट्या जागा झाला. झोपमोड झाल्यामुळे त्यानं चिडून मोऽऽऽठ्ठी डरकाळी फोडली. सगळे प्राणी घाबरून आपापल्या जागी चिडीचूप बसले. पिट्याच्या आईनं बिळातली आपली पिल्लं मोजली. तर ती तीनच! ती फार घाबरली. काय करावं सुचेना.
इकडे पिट्या तर फार म्हणजे फारच घाबरला. कारण त्यानं एवढा मोठा आवाज आतापर्यंत कधी ऐकलाच नव्हता. तो पळून जाणार तेवढ्यात त्याची शेपटी बिबट्यानं दाबून धरली. पिट्या भीतीनं थरथर कापायला लागला. गयावया करू लागला. बिबट्यानं त्याला आपल्या पंजात पकडून तोंडाजवळ आणलं आणि म्हणाला, “खाऊ का तुला?’ पिट्या रडत रडत म्हणाला, “नको, नको, मला खाऊ नका. माझी आई, माझी भावंडं तिकडं वाट पाहात असतील.’ पण बिबट्या आता फार चिडला होता. म्हणाला, “तू याचा आधीच विचार करायला पाहिजे होतास. तू केवढा, मी केवढा… आणि माझ्या खोड्या काढतोस?’ पिट्यानं त्याची पुनःपुन्हा क्षमा मागितली.
म्हणाला, “आता मी पुन्हा कधीही कोणाचीही खोडी काढणार नाही. खरंच… शप्पथ! मला घरी जाऊ द्या. मला सोडा.’ शेवटी बिबट्याला त्याची दया आली. तो म्हणाला, “बरं, मी सोडेन तुला पण आता इथून पुढं तू कोणाचीही खोडी काढणार नाहीस असं वचन दे मला.’ पिट्यानं त्याला वचन दिलं. तो कसाबसा घरी आला. घरी आल्याबरोबर सगळ्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. पिट्या म्हणाला, “आता मी नाही रे बाबा कोणाची खोडी काढणार.’ आणि त्यानंतर पिट्यानं कधीही कुणाची खोडी काढली नाही आणि कुणालाही त्रास दिला नाही.
– माधुरी तळवलकर