आपण अलीकडे वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्हीवर शेतकरी टोमॅटो, कांदे, बटाटे किंवा दूध रस्त्यावर फेकून देत असताना पाहिलं असेल, त्याबद्दलचं वृत्तही वाचलं असेल. शेतकरी आपला माल का फेकून देतात? त्यांना योग्य तो भाव मिळत नाही म्हणून. पिकाचा खर्चही भरून निघत नसेल तर माल विकून काय फायदा अशा विचारानं ते तो माल फेकून देतात. म्हणजे जिथं पिकतं तिथं ते विकलं जात नाही. जिथे माल विकला जाईल आणि योग्य भाव मिळेल तिथे तो नेण्याइतकी शेतकऱ्याची परिस्थिती नसते. परिणामी मालाची नासाडी होते. हे केवळ शेतकऱ्याचंच नाही तर समाजाचं आणि राष्ट्राचंही नुकसान आहे.
मग याला उपाय काय? आधुनिक माध्यम-साधनांचा वापर केला तर हा क्रय-विक्रय सोपाही होऊ शकतो. देशाला अनेक क्षेत्रांमध्ये खूप उंचावर नेण्याकरता काही खास प्रयत्न होताना दिसत नाहीत. एक उदाहरण टिटॅनियम या धातूचं घेऊ. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर आपला भारत देश टिटॅनियम धातूच्या अक्षरश: ढिगावर बसला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जगामध्ये टिटॅनियम खनिजाच्या बाबतीत भारताचा चीन व ऑस्ट्रेलियानंतर तिसरा क्रमांक लागतो. टिटॅनियम खनिजाचा भारतातील साठा नऊ कोटी चोवीस लाख मेट्रिक टन (स्रोत : स्टॅटिस्टा) एवढा प्रचंड आहे. मात्र, टिटॅनियम धातूचं उत्पादन अतिशय कमी, 500 मेट्रिक टन! हा धातू अतिशय उपयुक्त आहे कारण तो वजनानं हलका, पोलादाप्रमाणे अतिशय ताकदवान आणि गंजविरहित असा आहे. या गुणधर्मांमुळे त्याला विमान आणि अवकाशयान बांधणीमध्ये खूप मागणी आहे. पण…
भारत जर टिटॅनियमच्या ढिगावर बसला असेल तर तो थोरियमच्या पहाडावर बसला असेल असं म्हणावं लागेल. जगात थोरियम खनिजाच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो (9 लाख टनांपेक्षा जास्त साठा). सध्या कर्बविरहित ऊर्जेची समस्या जगाला (आणि भारतालाही) भेडसावते आहे. अणुऊर्जा हा एक उपाय आहे.
त्यासाठी लागणारं युरेनियम आपल्याला आयात करावं लागतं आणि यासाठी जगभरातून खूप विरोध होत आहे. थोरियमच्या साह्यानं पण अणुऊर्जा मिळवता येते. तेच स्वप्न होमी भाभा यांनी 1950 साली पाहिलं होतं. मात्र अजूनही आपण या प्रकल्पावर फारशी प्रगती केली नाहीये. आता या परिस्थितीला काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा.
काही काळापूर्वी जागतिक आरोग्यसंस्थेनं कुपोषणाच्या समस्येबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. कुपोषणाचा सामना शेवगा ही वनस्पती खूप चांगल्या प्रकारे करू शकते असं त्यात म्हटलं होतं. कारण शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्येसुद्धा दुधापेक्षा जास्त पोषक द्रव्यं असतात. या अहवालात दोन नकाशे दिले होते.
एकात कुपोषणाची तीव्र समस्या असलेले देश दाखवले होते, तर दुसऱ्यात मोठ्या प्रमाणात शेवगा वृक्ष असलेले देश दाखवले होते. गंमत म्हणजे दोन्ही नकाशांतील देश (यात भारताचाही समावेश होता) एकच होते. म्हणजे जिथं प्रश्न होता तिथेच उकलही होती. पण पिकतं तिथे विकत नाही ना!
भारत मृदुप्रणालीमध्ये (सॉफ्टवेअर) आघाडीवर आहे हे सर्वज्ञात आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अडोब अशा जगातील सर्वोच्च माहिती तंत्रज्ञान कंपन्या भारतीय तंत्रज्ञच चालवीत आहेत- आणखी मोठ्या स्तरावर नेत आहेत. नासासारख्या महत्त्वाच्या अंतराळ संस्थेतही अनेक भारतीय शास्त्रज्ञ काम करीत आहेत.
पण भारतात केवळ इस्रोनं कमाल करून दाखवली आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांची जगद्विख्यात आणि सर्वदूर वापरली जाणारी उत्पादनं भारतात निर्माण होऊ शकली नाहीत. कारण काय तर उपलब्धी आणि उपयोग यांची सांगड घालता येत नसेल तर पिकतं तिथे विकत नाही असंच आपल्याला म्हणत बसावं लागेल!
श्रीनिवास शारंगपाणी