संशोधनासाठी अनेक गावं, खेडी, वाड्या, वस्त्या हिंडाव्या लागल्या. या निमित्ताने अनेक लोकांना भेटायची संधी मिळाली. एका संशोधनासाठी बीड जिल्ह्यातील टाकळ गव्हाण गावात गेले होते. बहुतेक कुटुंबाचा व्यवसाय शेतमजुरी, त्यातच उन्हाळ्यात पाणी नाही म्हणून शेती नाही. मग मिळेल ती कामं करून पोट भरायचे आपलं आणि मुलांचं.
पाण्याचं दुर्भिक्ष तर विचारूच नका. वर्षातले जवळपास सहा महिने पाणी टॅंकरने येणार. बरं टॅंकर काही रोज नाही येणार, तर आठ दिवसांतून एकदा. आता आठ दिवसांत एकदा पाणी आलं तर घरातल्या बाईने काय करायचं, पाणी कशा कशासाठी पुरवायचे, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी, काय काय करणार? आंघोळ तर रोज सगळ्यांनी केलीच पाहिजे. ते बघून इतकं वाईट वाटलं.
पाणी वाया जात असेल इतर ठिकाणी तरी वाईट वाटतं आणि ते गाव डोळ्यासमोर येतं. एखाद्या दिवशी एक तासभर जरी पाणी उशिरा आले तरी आपली चिडचिड, आदळआपट सुरू असते, तोंडाचा पट्टाही जोराने चालू असतो. मनात एकच असतं “पाणी नाही म्हणजे काय?’ त्यापुढे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व पटलं.
बाहेर कुठे जायचं तर तासन्तास बससाठी उभं राहावं लागतं. आपण मात्र घराबाहेर पडल्याबरोबर हात दाखवून वाहन थांबवतो. आपला मिनिटभर वेळही वाया जात नाही. पावसाळ्यात कच्चा रस्ता असल्याने उड्या मारत त्यावरून जायचं. कारण चिखलाशिवाय काही नाहीच. कमाल आहे. सामान, किराणा आणायचा तर सहज 1-2 कि. मी. चालावं लागतं. आजारपण, दवाखाना हे तर जिकिरीचे. पावसाळ्यात मुलांना शाळेत पाठवायचीसुद्धा काळजी, मधेच पाऊस आला गाडी अडकली तर काय करायचं, फोनचं नेटवर्क नसतं. अनेकदा फोनच नसतो.
हे सगळं पाहिल्यावर माझ्या मनात प्रकर्षाने आलं की, आपल्याला जगण्याविषयी तक्रार करण्याचा खरोखरच काही अधिकार नाही. सगळ्या सुखसोयी आपल्या पुढ्यात हजर आहेत. पण तरीही आपल्याकडे सहनशीलता नाही, हे सत्य आहे.
संशोधनासाठी केलेल्या भटकंतीने इतकं काही शिकवलं जे उच्च शिक्षणातही शिकायला मिळालं नाही. निसर्गाची आपणच दुर्दशा केली आणि आपणच ओरड करायची. कसं चालेल. एरवी जसं कर्म तसं फळ हा सिद्धांत सांगायचा. मग तो न्याय इथेही लागू पडतोच ना. परिस्थिती पुढे सगळ्यांना शरण जावं लागतं, विना तक्रार गेलो तर त्रास थोडा कमी.
डॉ. नीलम ताटके