कीर्तीच्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती. इतिहास हा विषय त्यांच्या जास्त आवडीचा होता. ते गीतेवर सतत लिहीत असत, वाचत असत. कारणाशिवाय घरातून ते कधीच बाहेर पडत नसत. कीर्तीला पण ते कधी कधी सोबत घेऊन जात असत.
त्यावेळी कोणी भेटले की त्यांना नमस्कार करून लगेच पुढे जायचे, हे पाहून कीर्ती म्हणायची, “आपण त्यांच्याशी बोललो का नाही?’ तर वडील म्हणायचे, “हे बघ, गप्पांमधे उगाचच वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी जाऊन मुले शिकवणीला येतील ना.. त्यांच्या अभ्यासाचा विचार करीन.’ पण कडक शिस्तीच्या वडिलांना त्यांच्याशी दोन शब्द बोललो असतो तर? असे विचारायची हिम्मत कीर्ती आणि तिच्या भावंडांची कधीच झाली नाही.
शिवाय तिची आई पण मुलांना सांगायची की ते कधी नुसते बसलेले बघितलेत का? तो गुण घ्या त्यांचा! आईचं खरं होतं म्हणणं. किर्ती आणि भावंडं वाड्यात गप्पा मारायला जात असत. पण घरी आल्यावर वडील म्हणत, “अरे, काय उगाच गावगप्पा मारण्यात वेळ घालवता. त्यापेक्षा अभ्यासाव्यतिरिक्त जरा चार पुस्तके वाचत चला.’
मुळातच हुशार असलेली कीर्ती मोठी होत गेली तशी खूप शिकत गेली.अनिकेत हा तिचा जीवनसाथी तिने आपला आपणच निवडला होता.अर्थातच या लग्नाला माहेरचा पाठिंबा होताच! माहेरच्या आठवणी आणि आई-वडिलांनी केलेले संस्कार घेऊन तिने हसत-खेळत सासरच्या घरात प्रवेश केला. सासू-सासरे, नवरा आणि ती अशा चौघांच्या परिवारात एका वर्षाच्या आत प्राचीचा जन्म झाला.
प्राची दहा वर्षांची झाल्यानंतर कीर्तीने आपल्या करिअरची सुरुवात केली. प्राची लहान असताना तिच्या सासूबाई म्हणत असत, “अगं, तू तुझे शिक्षण वाया जाऊ देऊ नकोस. मी बघीन प्राचीला. माझी पण नातं आहे ना! माझे भरतकामाचे वर्ग मी फक्त शनिवार आणि रविवारच घेते तर शनिवारचे वर्ग मी आपल्या दोघींच्या सोयीनुसार घेत जाईन.’ तिचे सासरे त्यांच्या सोसायटीच्या हॉलमधे कॉलेजातील मुलांसाठी गणिताचे क्लास घेत असायचे.
ते कीर्तीला म्हणायचे, “पण, अगं किर्ती नोकरी न करता तुला इथे पण क्लासेस घेता येतील. सोसायटी सांगेल त्याप्रमाणे आपण तू घेणार असलेल्या क्लासची फी भरत जाऊ, बघ विचार करून.’ बाबांच्या म्हणण्याला अनिकेतनेही दुजोरा दिला. किर्तीने त्या तिघांनाही सांगितले की, प्राची दहा वर्षांची झाल्यानंतर मी प्राथमिक शाळेतच शिकवणार आहे.कारण मला शिक्षणाचा पाया भक्कम करायचा आहे.
तोच ढिसाळ असेल तर शिक्षणाच्या गुणवत्तेला काहीच अर्थ राहणार नाही. हे तिने ठामपणे सांगितल्यावर त्या तिघांनीही तिचा मान राखत “आमचा तुला पाठिंबा आहे,’ असे सांगितले. एवढी शिक्षित असूनही इ. 1ली ते इ. 4थीच्या मुलांना शिकवायला जाणार म्हणजे शिक्षण वाया घालवणार, असे म्हणणारे ते तिघेजण नव्हते. म्हणूनच किर्ती भाग्यवान होती.
लग्न झाल्यावर सासर हेच माझे माहेर आहे, असा चांगला विचार तिने केला होता. ऊठसूठ आई-वडिलांना सतत फोन करण्यापेक्षा ती अनिकेतला आणि सासू-सासऱ्यांना आपल्याला आलेल्या शंका विचारायची कारण नवऱ्यावर तर प्रेम होतेच पण सासू-सासऱ्यांवरसुद्धा तितकेच प्रेम होते.सासू-सासऱ्यांनी प्राथमिक शाळेत शिकवायला परवानगी दिली. याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे होते म्हणून ती त्यांच्या खोलीमधे गेली.
दोघांना नमस्कार केला. म्हणाली,”मला काही बोलायचे आहे, तर बोलू का?’ दोघांनी परवानगी दिल्यावर सासूबाईंचा हात हातात घेऊन म्हणाली, “प्राची तुमची नात आहे. तुम्ही तिचा प्रेमानी सांभाळ करालच. शेवटी आजी-आजोबांचे प्रेम म्हणजे दुधावरची सायच असते. मी शाळेत गेल्यावर तुम्ही प्राचूला नीट सांभाळणार नाही, असा विचार करणे म्हणजे एकाअर्थी तुमच्यावर विश्वास नाही म्हणून मी नोकरी करणार नाही, असा अर्थ तुम्ही घेणार नाही याची मला खात्री आहेच.
पण आई म्हणून माझे कर्तव्य मी करायला नको का? याचा अर्थ फक्त मीच तिला वाढवणार असा नाही. आपण सर्वजण मिळून तिच्यावर संस्कार करणार आहोत आणि तिचे लाडही करणार आहोतच. पण खरं सांगू का? मी माझे जे विचार सांगणार आहे ते ऐकून तुम्ही म्हणाल की, ही आमची सून कोणत्या युगात वावरत आहे?पण मी किनई थोडीशी टिपीकल आहे.’ हे ऐकून सासूबाई म्हणाल्या, “तू आमची सून नसून तू आमची मुलगी आहेस. तुझे एवढे शिक्षण झाले आहे मग तुझे विचार नक्कीच पटणारे असतील. बोल बेटा.’
मग कीर्ती म्हणाली, “मला करिअरला महत्त्व द्यायचे असते, तर मी लग्नच केले नसते, किंवा प्रेमविवाह झाला नसता तर वधू-वर विवाह संस्थेमधे नाव नोंदणी करून, रीतसर दाखवायचा कार्यक्रम करून लग्न केले असते तर आधी नवऱ्याला आणि सासरच्या मंडळींना सांगितले असते की, माझे शिक्षण मी वाया जाऊ देणार नाही. त्याकरता मी चूल-मूल यात अडकून न पडता करिअरला महत्त्व देणार आहे, असे ठामपणे सांगितले असते.
लिव्ह इन रिलेशनशिपचा तर विचारच केला नव्हता, पण यातले मला असे काहीच करायचे नव्हते म्हणूनच तर लग्न झाल्यावर एका वर्षाच्या आतच मला दिवस गेले आणि प्राचीचा जन्म झाला; पण त्यावेळी सुद्धा मी माझ्या करिअरचा विचार केला नाही. स्त्री-पुरूष समानतेचे युग असले तरी बाळ झाले की बाळाजवळ आई असणे जास्त गरजेचे आहे. अशावेळी आईने बाळासाठी वेळ दिलाच पाहिजे, तोच वेळ मी लेकीसाठी देत आहे आणि एक सांगते की, शिक्षण वाया जात नाही.
चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर त्याला कुठूनही मार्ग मिळतोच.’ कीर्तीचे हे विचारपूर्वक बोलणे ऐकून सासरे म्हणाले, “बेटी, तुझ्या प्रत्येक मार्गात आमची साथ आहे. आईचे प्रेम तर प्रथम महत्त्वाचेच आहे, तर विशिष्ट वयाच्या पायऱ्यापर्यंत आई-वडिलांचा हात धरून चढणे हे मुलांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या पायऱ्यांवर चढताना आमच्या सारख्या आजी-आजोबांचा आधार तर हवाच! आणि आजी-आजोबांनाही सर्वांचा आधार हवाच की!’ असे म्हणून सासऱ्यांनी तिला आशीर्वाद दिला. म्हणूनच तर कीर्ती भाग्यवान! कारण असे सासू-सासरे मिळाले अन् नवरा साथ देणारा मिळाला.
कीर्ती दुपारच्या वेळेत आपल्या लेकीबरोबर सोसायटीतील मुलामुलींना घेऊन त्यांना गोष्टी सांगायची. मधेच त्यांना प्रश्न विचारायची किंवा मधेच गोष्टीला अनुसरून एखादे छानसे उदाहरण द्यायची. पण लगेच विचारायची की, गोष्ट कुठपर्यंत आली होती? यामुळे मुले लक्ष देऊन ऐकत, यामुळे कळत न कळत त्यांची एकाग्रता वाढू लागली. तीच त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आणि इतर उपक्रमांसाठी उपयोगी पडू लागली.
यासर्वांना घेऊन संध्याकाळी मोकळ्या मैदानात खेळायला घेऊन जायची. तर कधीतरी जवळपासच्या बागेत किंवा ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे बघायला घेऊन जात असे. त्यावेळी त्या ठिकाणाचे महत्त्व सांगायला विसरत नसे.यामुळे न कळत मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली. मुलांना सांगितलेल्या गोष्टी, गाणी, निरनिराळे खेळ, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे बघताना मुलांना पडलेले प्रश्न आणि त्यावर तिने मुलांना दिलेली खुमासदार उत्तरे हे सर्व कीर्तीने लिहून ठेवले.
त्याचे एकत्रीकरण करून तिने एक पुस्तक लिहिले. यावरूनच एक लक्षात येते की तिने घेतलेले शिक्षण तिच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडले. प्राची थोडी मोठी झाल्यावर आता आपण तिच्यापासून काही तास दूर राहिलो तर चालणार आहे. हे लक्षात आल्यावर तिला एका प्राथमिक शाळेतून “शिक्षिका म्हणून नोकरी करायला आवडेल का?’, असा फोन आला होता. त्यावेळी घरातील तिघांशी आणि लेकीशी बोलून शाळेला होकार कळवला.
शाळेत जायच्या पहिल्या दिवशी कीर्ती देवाच्या पाया न पडता सासू सासऱ्यांच्या पाया पडली. म्हणाली, “तुमच्या अंतरंगातून मला देव भेटला आहे. मला आशीर्वाद हवा आहे.’ अनिकेतने डोळ्यांतूनच शुभेच्छा दिल्या. लाडकी लेक आईला मिठी मारताना म्हणाली, “आई, मी कुणालाही त्रास देणार नाही, अभ्यास करीन आणि तुझ्याकडून तुझ्या शाळेतील पहिला दिवस ऐकण्यासाठी तुझी वाट बघत बसीन. जेव्हा माझा शाळेचा पहिला दिवस झाला होता ना तेव्हा मी कधी शाळेतून येतीयं असं तुला झालं होतं ना गं!
सारखी दारात येऊन उभी राहत होतीस. मला नाही आठवत पण मी थोडीशी मोठी झाल्यावर आजीने मला सांगितले होते. बाबांबरोबर मी शाळेतून आल्यावर तू धावत धावत व्हरांड्यात आली होतीस. तुझ्या डोळ्यांत आनंदाने पाणी आले होते, हे बाबांनी सांगितले होते म्हणून आई मी पण तुझी वाट बघणार आहे. हे मात्र मला नक्की आठवणार आहे. कारण मी आता थोडीशी मोठी झाली आहे ना! तुझ्या स्कूटरच्या हॉर्नचा आवाज ऐकला की येईन पळत पळत’, असे म्हणत लेकीने हसत हसत आईला अच्छा केला. या साऱ्या शुभेच्छा घेऊन घराला नमस्कार करून शाळेचा आशीर्वाद घ्यायला आणि शाळेची “कीर्ती’ वाढविण्यासाठी कीर्ती आज खऱ्या अर्थाने घराबाहेर पडली.
(क्रमशः)