आज ना छोडेंगे, बस हम चोली
खेलेंगे हम होली… हे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचे, किंवा
रंग बरसे भिगी चुनरिया…री रंग बरसे…
म्हणत अमिताभ आणि रेखा यांनी साऱ्या थिएटरला वेड लावत खेळलेली होळी किंवा शोले या बहारदार सिनेमातील हेमामालिनीची होळी असो…या बॉलिवूडच्या सदाबहार रंगीन दुनियेत या होळी सणाने इतके रंग भरले की सिनेमातील होळीची गाणी हा लेखनाचा स्वतंत्र विषय होईल. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी ताल धरला आणि या रंगात ते न्हाऊन निघाले. कारण हा सणच आहे उत्सवाचा, आनंदाचा, गाण्याचा, नाचण्याचा, अमंगल ते सारे टाकून देण्याचा आणि रंगीबेरंगी रंगाच्या उधळणीचा. तो सिनेमाचा पडदा जसा रंगांनी भरून जात असे, तसं माणसाचं मन या विविध रंगांनी भरून आनंदित होत असे. म्हणूनच हा सण आनंदाची उधळण करणारा, जीवनात चैतन्य आणणारा, वाईट सारे सोडून माणसांना एकत्र आणणारा असल्याने धूमधडाक्यात सर्वत्र साजरा केला जातो.
करोनाच्या या काळात एकत्र येण्यास बंदी असल्याने, होळीवर एक गडद छाया पडली आहे. तरीही हे संकट दूर होऊ दे म्हणून या होलिकेची पूजा आपण नक्की करू आणि अमंगल दुष्ट व्हायरसरूपी राक्षसाचा नायनाट करू.
दुष्ट राक्षसी शक्तींचा नाश करण्यासाठीच पूर्वीपासून होळी साजरी करण्याची पद्धत पडली. ढूंढा नामक एक राक्षसी गावात शिरून मुलांना त्रास द्यायची. त्यांच्यात रोगराई पसरवायची. तिला घालवण्यासाठी खूप प्रयत्न केले तरी ती जाईना. तेव्हा नारद मुनींनी युधिष्ठिराला हा उपाय सांगितला आणि होळी साजरी होऊ लागली.
आज नेमकी तशीच परिस्थिती आहे. एक व्हायरसरूपी राक्षसाने साऱ्या मानवजातीला वेठीस धरले आहे. त्याला घालविण्यासाठी आपण प्रयत्न करू या. काळ बदलला पण संकल्पना त्याच आहेत. फक्त त्यातील संदर्भ बदललेत. असा हा दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून, सन्मार्ग दाखविणारा उत्सव म्हणजे होळी. आपल्या देशात सर्वत्र हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याची नावे विविध आहेत. पण थोड्या फरकाने हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत आनंदाने साजरा होतो.
उत्तरेकडे हा सण फार मोठा मानतात. त्याला होरी म्हणतात. गोवा आणि महाराष्ट्रात हा शिमगा आहे तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणतात. हुताशनी, कामदहन अशी विविध नावे असली तरी त्या मागचा मूळ हेतू एकच आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. या दिवशी रंग खेळून आनंद साजरा करतात. सदाबहार वसंत ऋतूचे आगमन होत असल्याने याला वसंतोत्सवही म्हणतात.
होळी हा सण निसर्गातील बदलाचेही कारण आहे. नुकतीच थंडी संपलेली असते. थंडीत गारठलेली पाने, झाडे, माणसे जराशा उन्हाने उत्साहात असतात. झाडांची पानझड झालेली असते. पालापाचोळा सर्वत्र पसरलेला असतो. तो सारा परिसर स्वच्छ करण्यासाठीच जणू होळीची परंपरा सुरू झाली असावी.
होळीच्या बऱ्याच आख्यायिका प्रचलित आहेत. त्यात श्रीकृष्णांनी पुतनेचा केलेला वध, म्हणून उत्तरेकडे पुतनाला होळीत जाळतात, तर दक्षिणेकडे कामदेवाला. कारण कामदेवाने पार्वतीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला म्हणून शंकरांची तपश्चर्या भंग पावली. तर महाराष्ट्रात भक्त प्रल्हादाची आणि हिरण्यकश्यपूची कथा प्रचलित आहे.
होळीची रचना साधारणपणे सारखी असते. मोकळ्या जागेत मधोमध एक खड्डा करून त्यात एरंडाची फांदी, ऊस रोवतात. आजूबाजूला गोवऱ्या, लाकडे, पालापाचोळा रचून शंकूसारखा आकार करतात. कडेने रांगोळी काढतात. होळी उभी करून झाली की तीन प्रदक्षिणा घालून कापराने होळी पेटवली जाते. हा मान घरातील अथवा गावातील मोठ्या व्यक्तीचा असतो. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणूनच आपण “होळी रे होळी, पुरणाची पोळी’ असे म्हणतो. होळीत नारळ, खोबरेही वाहतात.
शेतकरी वर्गातही या सणाचे महत्त्व आहे. हातात आलेल्या पिकाबद्दल देवदेवतांचे स्मरण करण्याची पद्धत आहे. गव्हाचे पीक या वेळी तयार होते म्हणून ओंब्या वाहायची पद्धत आहे. हिंदू संस्कृतीत अग्नीला देवता मानले जाते. त्याच्या पूजनाचाही हा आविष्कार आहे.
कोकणात “शिमगा’ नावाने साजरा होणारा हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पोटापाण्यासाठी बाहेर गेलेले लोक हमखास कोकणात येतात. गावात पालख्या काढतात. आदिवासी जमातीमध्येही या सणाचे महत्त्व आहे. गुलाल उधळून, ढोल वाजवून स्त्री पुरुष नृत्यात सहभागी होतात. जेवणात पुरी, मासळी, गोड भात बनवितात.
वाद्यांच्या तालावर विशिष्ट पद्धतीने नृत्य केले जाते. महाराष्ट्र, प. बंगाल, ईशान्य भारत, राजस्थान, गुजरात या विविध भागांत थोड्याफार फरकाने हा सण परंपरा राखत आजही आनंदाने साजरा केला जातो. पुरातन काळापासून या सणाच्या निमित्ताने मिळणारा संदेश आजसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. वाईट प्रवृत्ती, गोष्टी, अगदी करोना व्हायरसचा देखील नाश होऊन, चांगले विचार, चांगल्या गोष्टी आणि भयमुक्त जीवनासाठी हा सण पुरणपोळी आणि रंगाने न्हाऊन आनंदाने साजरा करू या.
होली है, भाई होली है…
आरती मोने