एकेकाळी त्यांना विरोध करणारे आता मैदानातही त्यांची स्तुती करण्यात मागे हटत नाहीत. गावातील लोकांची विचारसरणी बदलत चालली आहे. चार वर्षांपूर्वी स्थानिक मुलींची आवड पाहून एका संस्थेने आदिवासी भागात महिला क्रिकेट संघ सुरू केला…
मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील जमीन सुपीक मानली जाते आणि तेथील 70 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजातील आहे. मात्र, हा परिसर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अजूनही मागासलेला आहे. मागासलेपण असूनही येथील आदिवासी मुली क्रिकेटमध्ये आपला चमत्कार दाखवत आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनग्राम चंद्राखाल येथील आदिवासी मुलींचा क्रिकेटचा सामना पूर्वी झाला होता. तो पाहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले होते आणि परिसरातील 15 गावांमधील मुली बॅट आणि बॉल घेऊन एकमेकांना पराभूत करण्यासाठी कौशल्य पणाला लावत होत्या. खुल्या मैदानात क्रिकेट स्पर्धा खेळणे हे वर्षानुवर्षे भेदभावाचा बळी ठरलेल्या मुलींसाठी एक मोठे यशच होते. गणवेश घालून या मुलींनी क्रिकेट खेळणे यापूर्वी कोणालाही मान्य नव्हते, पण या मुलींनी ही धारणा बदलवून दाखवली. या मुलींनी आधी कुटुंबाचा आणि नंतर समाजाचा विश्वास जिंकला आणि हा प्रयत्न शक्य करण्यासाठी सिनर्जी संस्थेने सहकार्य केले.
लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी या संस्थेने चेजलूमर कार्यक्रम सुरू केला होता. त्याअंतर्गत मुलींची रुची जाणून घेऊन त्यांना त्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. आदिवासी मुलींसोबत गावातील काही मुस्लीम मुलींनीही क्रिकेट खेळण्यात रस दाखवला; मात्र सुरुवातीला फक्त दोनच मुलींना घरच्यांनी खेळण्याची परवानगी दिली. मुस्लीम कुटुंबातील तोशिबा कुरेशी आणि आदिवासी कुटुंबातील हेमा मंडराई या दोघींसाठी संस्थेने प्रशिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हरदा क्रिकेट असोसिएशनबरोबर वाटाघाटी झाल्या. मात्र, एकही प्रशिक्षक मुलींना प्रशिक्षण देण्यास तयार होत नव्हता. बराच प्रयत्न केल्यानंतर, मुलींच्या सरावाच्या वेळी संस्थेचा एखादा पदाधिकारी मैदानावर उपस्थित राहील, या अटीवर संस्थेला यश मिळाले. दोन मुलींपासून सुरू झालेल्या या मोहिमेत वर्षभरात 15 मुली सामील झाल्या. मुलींचा आत्मविश्वास वाढविणारी ही गोष्ट होती. या मुलींनी आपल्या मेहनतीने आणि बचत केलेल्या पैशांमधून बॅट-बॉल खरेदी केले.
अर्थात या कामी काही संस्थांनी मदतही दिली. अशा रीतीने मुलींच्या क्रिकेट संघाची सुरुवात झाली. आज जेव्हा त्यांची स्पर्धा आयोजित केली जाते, तेव्हा संस्था, पंचायत, वनविभाग, महानगरपालिका यांसह अनेक संस्था मदत करतात. वनविभाग त्यांच्या स्पर्धेसाठी मैदान समतल करून घेतो. प्रेक्षकांना बसण्यासाठी तंबू उभारतो. नेहरू युवा केंद्रातर्फे विजेत्यांसाठी स्मृतिचिन्हे तयार केली जातात. संस्थेतर्फे पुरस्काराची रोख रक्कम दिली जाते. आता परिस्थिती अशी आहे की, 15 गावांमधील मुलींमध्ये स्पर्धा होऊ लागल्या आहेत. एकेकाळी याला विरोध करणारे आता मैदानात या मुलींची मुक्तकंठाने प्रशंसा करतात. गावातील लोकांची विचारसरणीही बदलू लागली आहे. विमल जाट यांच्या म्हणण्यानुसार, चार वर्षांपूर्वी स्थानिक मुलींची आवड पाहून येथे महिला क्रिकेट संघ सुरू केला. आज हा संघ राज्य आणि विभागीय स्तरावर खेळत आहे. आता मुलींना या क्षेत्रात येताना अवघडलेपण वाटत नाही, उलट त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हे पाहून अन्य गावांमधील मुलींनाही प्रेरणा मिळत आहे.
या स्पर्धेत खेळणाऱ्या सिगोंन येथील शीलाचे लग्न झाले आहे. ती सांगते की, पूर्वी आम्ही फक्त हातात झाडू आणि मोगरी घेत होतो. परंतु आता आमच्या हातात बॅट आहे. ढेकी गावातील मधू सांगते की, आम्ही सर्वजण अंतिम सामना खेळण्यासाठी रोज मैदानात सराव करतो. आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी घरातील कामे आपापसात वाटून घेतली आहेत. आम्हाला क्रिकेट खेळता यावे म्हणून ते आम्हाला घरातील कामांपासून दूर ठेवतात. हा सर्वांत मोठा बदल आहे. समाजाच्या विचारात सकारात्मक बदल क्रिकेटच्या माध्यमातून होत आहे. विशेषतः मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मुलीही चांगले क्रिकेट खेळू शकतात, हे या मुलींनी दाखवून दिले आहे आणि येथील मुलींना आता खेळात करिअर करायचे आहे.
– अवंती कारखानीस