महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांना समजावून घेऊन वैविध्यपूर्ण रचनात्मक कार्य करणे,चिरस्थायी व शाश्वत अशा कार्यातून ग्रामविकासाला हातभार लावणे व स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे अशा या सामाजिक बांधिलकीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास साध्य करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली व त्यातूनच आदर्शवत महाविद्यालयीन युवकांची चळवळ उभी राहिली.
स्वावलंबन, चारित्र्यसंवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षणपद्धतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे 24 सप्टेंबर 1969 साली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवाकार्य व क्रीडा मंत्रालयामार्फत राबविण्यात येत आहे.
तेव्हापासून आजतागायत 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये तसेच दत्तक खेड्यांमध्ये व परिसरात स्वच्छता अभियान, रक्तदान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, गलिच्छ वस्ती निर्मूलन, प्रबोधन व्याख्यानमाला, जनजागृती रॅली, पथनाट्य, सामाजिक विषयांवर प्रबोधन चर्चा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. या योजनेच्या स्थापनेला 52 वर्षे पूर्ण होत आहेत.
“माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी’ हे या योजनेचे बोधवाक्य असून त्यातून आपणास लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते.
आजची शैक्षणिक व्यवस्था आणि समाज यात अंतर पडलेले आढळते. समाजाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नकळत समाजाचा घटक म्हणून आपण स्वत:कडे वळतो व त्यात स्वत:लाही सामावून घेण्याचे कार्य साधू शकतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात गतीशील जीवनात माणूस स्वत:कडे अंतर्मुख होऊन पाहताना दिसत नाही. यासाठी या योजनेच्या माध्यमातून समाजातील व्यथा, प्रथा, वेदना, गरजा यांची माहिती होईल व खऱ्या अर्थाने जीवन काय आहे हे समजावून घेता येईल. शिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान व समाजजीवन यातील विसंगती जर थांबवायची असेल तर या माध्यमातून तरूणांना परावर्तीत करण्याचे कार्य होऊ शकते.
सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थी हा पुस्तकी चौकटीत आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीत गुंतलेला परीक्षार्थी म्हणून आढळतो. त्याच्यासमोर गुणवत्तेची स्पर्धा असते. या योजनेत श्रमदानाला अधिक महत्त्व आहे. कारण आपल्याकडे श्रमाला म्हणावी तशी प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे सेवा देण्याचा विचार हा दूरच राहतो.
एखादा समाज सुसंस्कृत समजला जातो, तेव्हा त्याची विचारप्रणाली, जीवनप्रणाली व उपासणा (ध्येय) प्रणाली उच्च व श्रेष्ठ असते. अशा सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी राष्ट्रीय सेवा योजना हे खात्रीपूर्वक कार्य करू शकते. या योजनेमुळे आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपासण्याचे कार्य केले जाते.
करोनाकाळातही युवक-युवतींनी या योजनेच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. म्हणूनच त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची ही चळवळ अखंडपणे सुरू राहावी यासाठी केंद्र शासन, राज्य सरकार, विद्यापीठे, महाविद्यालये सातत्याने या योजनेचा प्रचार व प्रसार आणि अंमलबजावणी युवकांच्या माध्यमातून करीत आहेत.
प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर