पुणे – शास्त्रीय संगीतातील रागांची सुरेल लहेर निर्माण झाली. पाठोपाठ तबला, मृदंग, वीणा, घट या वाद्यांची साथ मिळू लागली. कधी जुगलबंदीने तर, कधी शब्द-सुरांची सुरेल गुंफण करून सादर केलेला अविट कलाविष्कारात रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिजात कला आणि वैभवशाली परंपरेचा हा सांगितिक “रोलरकोस्टर राइड’ अनुभवताना प्रत्येक रसिक हर्षोल्लासित झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
केवळ पुण्यातीलच नाही तर, अखंड महाराष्ट्रातील प्रत्येक संगीतप्रेमी वर्षभर ज्या संगीत महोत्सवाची आतुरतेने वाट पहात असतो त्या “67 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ची सुरुवात बुधवारी झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गिरीश संझगिर यांचे गायन तर, जयंथी कुमरेश यांचे वीणा वादन रंगले.
संझगिर यांनी राग मुलतानीने गायनास सुरुवात करत गोकुलधाम…’ या रचनेसह “सखी रे आनी दे’ या रचना पेश केल्या. जन विजन झाले आम्हा…’ या अभंगाने त्यांनी मैफलीला विराम दिला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), प्रभाकर पांडव (हार्मोनियम), सावनी लाड, आशा मेहंदळे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
त्यानंतर जयंथी कुमरेश यांनी राग “नाटेकुरूंजी’ ने ताल आदीमध्ये आपल्या वीणा वादनाची सुरुवात केली. त्यानंतर राग “खिरवाणी’मध्ये आलाप, वीणा वादनातील वैशिष्ट्य असलेले तानम, पल्लवी पेश केले. त्यांनी राग तिश्र गतीतील धुन वाजवून आपल्या मैफलीला विराम दिला. त्यांना विद्वान जयचंद्र राव (मृदंगम), त्रिचिकृष्ण स्वामी (घट्टम) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाच्या तिसऱ्या सत्रात गायिका अर्चना कान्हेरे यांनी राग जोगकंसने गायनाची सुरुवात केली. “हे सुरांनो चंद्र व्हा…’ या नाट्यगीताने त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), प्रिया आठले व मंजु धिवाडकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. त्यानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी हेमवती रागात आपल्या वादनाला सुरुवात केली. पंडितजींच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली.