पिंपरी, दि. 23 – समाजामध्ये प्रत्येक घटकांचा विकास हा समतोल होणे आवश्यक आहे. सर्वांना रस्ते, पाणी इत्यादी मुलभूत सेवा मिळायलाच पाहिजेत. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट ठेऊन सर्वांनी काम करणे आवश्यक असून विद्यार्थी जिवनापासूनच व्यक्ती, समाज आणि देश म्हणून आपण ज्या प्रश्नांना सामोरे जात आहोत, त्यावर डोळ्यासमोरआधारित कार्यक्षेत्र निवडल्यास आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक विकास देखील होईल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.
मूलभूत सेवा देतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरवणे आणि त्याच बरोबर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवे प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. युवकांमध्ये उद्योजक बनण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी आणि श्री बालाजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ताथवडे कॅम्पस येथे गुरुवारी लक्ष्यवेध उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये स्टार्टअप उद्योजक या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी एसबीयुपीचे प्र-कुलगुरू आणि एसबीएसचे अध्यक्ष प्रा. बी. परमानंदन, मनपा माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख रविकिरण घोडके, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे विभाग प्रमुख डॉ. अनिल केसकर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट उपविभाग प्रमुख डॉ. मनीषा पालीवाल, अस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय गांधी आदी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्योजकता विकास कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि श्री बालाजी विद्यापीठ यांच्यात सिटीझन एंगेजमेंट, स्टार्टअप उपक्रमांविषयीच्या सामजंस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. डॉ. अनिल केसकर यांनी प्रास्ताविक केले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि श्री बालाजी विद्यापीठ यांनी एकत्रितपणे सुरु केलेल्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. गांधी यांनी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे स्टार्टअप सुरु करावेत, असे आवाहन केले. मनोज मिश्रा यांनी स्टार्टअप्सकरिता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक, कायदेशीर आणि अन्य सहाय्यतेविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.