देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूगाव वैकुंठगमन येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले निवारा केंद्र हे जिल्ह्यातील “रोल मॉडेल’ झाले आहे, असे उद्गार उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांनी व्यक्त केले.
देहूगाव वैकुंठगमन येथील निवारा केंद्राची पाहणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी बारवकर यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. या वेळी अपर तहसीलदार गीता गायकवाड, तलाठी अतुल गीते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, सरपंच पूनम काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे, पोलीस पाटील चंद्रशेखर टिळेकर, सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विशाल काळोखे, कोतवाल संभाजी मुसूडगे, शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बेघर, भटके, निराधार, निराश्रित, दर्शनार्थ देहूत आलेले आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेले भाविकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. त्यांची सोयी सुविधांसाठी वैकुंठगमन येथील भक्त निवास येथे जिल्ह्यातील पहिले निवारा केंद्र तयार करण्यात आले. येथे सुमारे दीडशे नागरिक असून, त्यांची दोन वेळची जेवणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या केंद्रात करमणुकीसाठी एलसीडी लावण्यात आले आहे. या केंद्रावर परिसरात असलेले बांधकाम मजुरांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारा शिधा शासन, दानशूर व्यक्तींकडून गोळा करण्यात येत आहे. येथे सकाळ-संध्याकाळ असे दोन वेळा सुमारे 800 नागरिकांना अन्नदान केले जात आहे. या वेळी येथील नागरिकांना काही अड़ीअडचण आहे का अशी विचारणा उपजिल्हाधिकारी बारवकर यांनी केली. हा निवारा केंद्र जिल्ह्यातील रोल मॉडेल बनले आहे, असे गौरवोद्गार उपजिल्हाधिकारी बारवकर यांनी या वेळी काढले.
सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गोरगरीब, निराधार, निराश्रित नागरिकांवर उपासमार होऊ नये यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांनीही सोशल डिस्टन्स बाळगणे, मास्क वापरणे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, स्वतः जबाबदारी व संयम बाळगत नागरिकांनी सहकार्य करणे आणि प्रशासनाला प्रतिसाद देणे हेच मोठे आव्हान आहे.
– सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी