लंडन – इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचे शतक जेम्स अँडरसनच्या अफलातून चेंडूवर त्रिफळा बाद झाल्यामुळे हुकल्याचे सांगितले जात असले तरीही त्यासाठी मैदानावरील पंचांनी दुर्लक्ष केल्याचाही फटका सामील आहे.
रोहित 83 धावांवर खेळत होता त्यावेळी त्याच्यासह लोकेश राहुलनेही पंचांकडे अंधूक प्रकाश असल्याची तक्रार केली होती. मात्र, पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. याच झाकोळलेल्या वातावरणात खेळावे लागल्याने अँडरसनचा इनस्विंगर रोहितला समजलाच नाही व त्याचा त्रिफळा उडाला, अशी माहिती खुद्द राहुलनेच दिली आहे.
लॉर्डसच्या मैदानावर या कसोटीतील पहिल्या डावात रोहितने 83 धावांची खेळी केली. तो शतकाकडेही कूच करत होता. त्यावेळी 44 व्या षटकात अँडरसनच्या इनस्विंगरवर रोहितचा त्रिफळा उडाला. या षटकाच्या एक षटक आधीच राहुलसह रोहितनेही अंधूक प्रकाश असल्याची तक्रार पंचांकडे केली होती. जर पंचांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले असते व खेळ थांबवला असता तर रोहितला दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण करण्याची संधी मिळाली असती.
गेल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत रोहितने अद्याप परदेशात कसोटी शतक फटकावलेले नाही. या डावात ही कसर भरून काढण्याची संधी त्याला मिळाली होती. मात्र, पंचांच्या चुकीमुळे त्याचे ऐतिहासिक लॉर्डसवरील शतक हुकले.