नवी दिल्ली – रोहित शेखर यांचे त्यांच्या पत्नीशी जमत नव्हते, त्यातच त्यांना त्यांच्या राजकीय करिअर मध्येही विशेष प्रगती करता आली नव्हती म्हणून ते अस्वस्थ होते. त्यांनी अलिकडेच एन डी तिवारी यांच्यावर जेथे अंतिम संस्कार करण्यात आले त्या स्थळालाही भेट दिली होती अशी माहिती त्यांच्या मातोश्रीं उज्जवला यांनी दिली आहे. रोहित शेखर हे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री एन. डी तिवारी यांचे सुपत्र आहेत. त्यांचा अलिकडेच संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या मृत्युबद्दल पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे.
त्या म्हणाल्या की आपल्या मुलाचा खून झाला आहे ही बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. त्यावर काय बोलावे हेच मला समजेनासे झाले आहे. शेखर आणि त्यांच्या मातोश्री मतदान करण्यासाठी 11 एप्रिल रोजी हलदवानी येथे गेले होते तेथून ते 12 एप्रिलला दिल्लीला परत येणे अपेक्षित होते पण आपल्याला काही जणानां भेटायचे आहे असे कारण देत शेखर हे तेथेच थांबले होते. मीही तेथे होते. आम्ही रानीबाग येथे थांबलो आणि त्यानंतर आम्ही नीम करोली बाबांच्या दर्शनासाठी गेलो होतो असा तपशील त्यांनी दिला.
आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांना राजकारणात करीअर करायचे होते पण त्यात त्यांना यश न आल्यानेही ते निराश होते असे त्यांच्या मातोश्रींनी सांगितले. 15 एप्रिल रोजी ते दिल्लीत परतले. त्यावेळी रोहित हे आपल्या डिफेन्स कॉलनीतील घरी परतले. आम्ही घरात नसतानाच शेखर यांना अस्वस्थ वाटू लागले असल्याचा फोन आपल्याला आला. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल पोस्टमार्टेम मधून मिळाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांकडेही चौकशी सुरू केली आहे.