Rohit Sharma Big Statement on Indian Cricket : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्माने नुकतेच एक असे वक्तव्य केले आहे, ज्याने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. रोहितने केवळ टीम इंडियाच्या सध्याच्या यशाचे कौतुक केले नाही, तर आगामी काळासाठी भारतीय क्रिकेटचे एक मोठे स्वप्न जगासमोर मांडले आहे. मुंबई इंडियन्सच्या (MI) एका विशेष कार्यक्रमात (ESA Day Event) बोलताना रोहितने भारतीय क्रिकेटचे भविष्य, युवा खेळाडूंची मानसिकता आणि बदलणारे क्रिकेट यावर मनमोकळेपणाने संवाद साधला. “भारत बनला पाहिजे जागतिक क्रिकेटचा बादशाह!” कार्यक्रमात बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “माझे स्वप्न भारताला जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि अजेय ताकद बनवण्याचे आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने प्रत्येक पातळीवर अप्रतिम कामगिरी केली असून आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. भारत जागतिक क्रिकेटचा खरा ‘पावरहाउस’ बनलेला मला पाहायचा आहे. गेल्या तीन वर्षांत भारतीय क्रिकेटने जे काही साध्य केले आहे ते खरोखरच अद्भूत आहे. २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप, महिला वर्ल्ड कप, अंडर-१९ वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आणखी एक टी-२० वर्ल्ड कप जिंकणे हे आपल्या क्रिकेट सुवर्णकाळाची साक्ष देते. मला आशा आहे की ही विजयी मालिका भविष्यातही अशीच सुरू राहील.” टी-२० क्रिकेट आता पूर्णपणे बदलले आहे! ROHIT SHARMA ON HIS LEGACY AND INDIAN CRICKET AS THE POWER HOUSE. 🇮🇳 – The Hitman Ro, An Inspiration! 🫡pic.twitter.com/GmywNO4Pid — Tanuj (@ImTanujSingh) May 24, 2026 रोहित शर्माने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपावरही भाष्य केले. तो म्हणाला, “जेव्हा मी माझ्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा टी-२० क्रिकेटमध्ये १३०-१४० धावांचा स्कोअरही आव्हानात्मक आणि सुरक्षित मानला जात होता. पण आजच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता कोणताही स्कोअर सुरक्षित वाटत नाही. मैदानावरील कोणतीही धावसंख्या आता डोळे झाकून भरवशाची राहिलेली नाही. क्रिकेटचा खेळ गेल्या काही वर्षांत किती वेगाने बदलला आहे, हेच यावरून दिसून येते.” “लहान मुलांवर अपेक्षेचे ओझे टाकू नका!” आजकालच्या पालकांना आणि प्रशिक्षकांना मोलाचा सल्ला देताना रोहितने कमी वयात मुलांवर दबाव टाकण्याच्या मानसिकतेवर आक्षेप घेतला. रोहित म्हणाला, “६ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर कामगिरीचा कोणताही अतिरिक्त दबाव टाकला जाऊ नये. त्यांना सुरुवातीला केवळ आपल्या मित्रांसोबत या खेळाचा मनसोक्त आनंद घेऊ दिला पाहिजे. माझ्या बाबतीतही सुरुवातीला असंच घडलं होतं. खेळाचा आनंद घेणे हीच यशाची पहिली पायरी आहे. कोणत्याही मुलाला जबरदस्तीने क्रिकेट खेळण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही.”