मुंबई – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. अशातच आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रा सरकारने स्थलांतरित मजुरांचे हाल केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथांच्या या टीकेवर महाराष्ट्रातील नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आमदार रोहित पवार यांनी देखील योगींच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
याबाबत आमदार पवार यांनी योगींच्या टीकेला प्रतिउत्तर देताना, “महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान असलेल्या स्थलांतरित मजुरांनी स्वगृही जाण्याचा आग्रह धरल्यानंतर #मविआ सरकारने CM फंडातून त्यांच्या प्रवासाची सोय केली. ” असं ट्विट केलं.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी “आज या मजुरांना क्वारंटाईन करण्याची, त्यांची अधिकाधिक टेस्ट करण्याची, त्यांना रोजगार देण्याची खरी गरज आहे. महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यामध्ये अधिकाधिक कोरोना टेस्ट करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी.’ असा सल्ला देखील दिला.
महाराष्ट्र सरकारला ‘ही’ विनंती
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कानउघाडणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारला देखील एक मोलाचा सल्ला दिला. ‘कोरोनाचे संकट टळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बहिरून येणाऱ्या मजुरांची पोलीस नोंदणी व आरोग्य तपासणी करूनच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा कारण योगी सरकारकडे अशा कोणत्याही नोंदी नसल्याचं स्पष्ट झालंय.’ असा सल्ला त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला.