जामखेड: कोणाला विरोध करण्यासाठी नव्हे तर विकासाचा संकल्प घेऊन निवडणूक लढवत आहे. मोठे प्रकल्प आणून या भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच टीकेऐवजी मतदारांच्या भवितव्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी केले.
आज राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील आनंदवाडी, धामणगाव, तेलंगशी, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ, पांढरेवाडी, व शहरातील प्रभाग क्रमांक 12, निमोणकर वस्ती येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, तालुक्यात सिंचनप्रकल्प, क्रीडासंकुल, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. तरुणांच्या हाताला काम नाही. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांचा पाठपुरावा झाला नाही. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, जमीर सय्यद, उमर कुरेशी, नगरसेवक दिंगबर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.