मुंबई – गोकुळाष्टमीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारने हा निर्णय बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतल्याचे म्हणत टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी याबाबत ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली.”
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात,”राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.”
राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 20, 2022
सरकारने गोविंदांबाबत घेतलेल्या या निर्णयावरून अनेक क्रीडा जगतातील खेळाडूंनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले.