कर्जत – आमदार रोहित पवार यांनी दिलेला शब्द पाळत कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी प्रकल्पातून १ ते २३ जानेवारी या वेळेत यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन सोडले. आवर्तन सोडण्यापूर्वी गेट दुरुस्तीसह देखभाल-दुरुस्तीची इतरही कामे पूर्ण केल्याने अनेक चाऱ्यांना पहिल्यांदाच पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कुकडी प्रकल्प हा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. आजवर कधीही शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आवर्तन सोडण्यात येत नव्हते. मात्र रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर या प्रश्नात लक्ष घातले आणि शेतकरी व अधिकारी यांना विश्वासात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात केली.
यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन १ जानेवारीला सोडण्याचे नियोजन त्यांनी शेतकरी व अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीत केले. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले. कुकडी कॅनॉलचा कर्जत तालुक्यातील ५४ गावांना फायदा होत असला तरी या सर्व गावांतील शेतकऱ्यांना कधीही पाणी मिळत नव्हते. परंतु आमदार रोहित पवार यांच्या नियोजनामुळे या आवर्तनासाठी ज्या गावांनी पाण्याची मागणी नोंदवली त्या शंभर टक्के गावांना पाणी देण्यात आले.
चाऱ्यांमध्ये झाडे-झुडपे उगवल्याने आणि त्यांची स्थिती योग्य नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत होती. मात्र रोहित पवार यांनी शासकीय खर्चासोबतच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गेटची व चाऱ्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे ‘टेल-टू-हेड’ अशा सर्व शेतकऱ्यांना पहिल्या दिवसापासूनच पूर्ण दाबाने पाणी मिळाले.
“शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पाणी मिळाले पाहीजे, असा माझा प्रयत्न राहिला. त्यासाठी शेतकरी आणि अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेऊन पाण्याचे नियोजन केले. चाऱ्यांची दुरुस्ती, डीप कटमधील गाळ काढणे, आवश्यक तिथे गेट बसविणे ही कामे केली. त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनीदेखील सहकार्य केले व आवश्यक ती मदतही केली, त्याबद्दल त्यांचे आभार.
– रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)