जामखेड – गेली तीन वर्ष जाणीवपुर्वक प्रलंबीत ठेवलेल्या २५० कोटी रूपये खर्चाची उजनी धरणावरून जामखेड शहराची नळपाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेला मंजूरी देतानाच आणि कर्जत तालुक्याला वरदान ठरणारी तुकाई उपसा सिंचन योजनेच काम सूरू करणेबाबत तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.
आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड तालुक्यातील भाजपा पदाधिका-यांचे शिष्टमंडळ गुरूवारी ( ता.१) मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गेली तीन वर्षापासून प्रलंबित असलेले जामखेड शहर पाणीपुरवठा योजना व मल निस्सारण योजनेला मंजूरी देतानाच, कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम सूरू करणेबाबत तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत आमदार राम शिंदे म्हणाले , उजनी धरणावरून राबवण्यात येणारी जामखेड शहराची पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजना आणि कर्जतला वरदान ठरणारी तुकाई उपसा सिंचन योजना या दोन्ही योजना स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकारने गेली तीन वर्षापासुन केवळ श्रेयासाठी बंद ठेवले होते. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी कर्जत जामखेडच्या जनतेला गेली तीन वर्षापासून वेठीला धरत पाण्यापासून वंचीत ठेवण्याचे पाप केले असल्याचा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
आमदार शिंदे म्हणाले, उजनी धरणावरुन जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ऑगस्ट २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र फक्त श्रेयासाठी आ रोहित पवार यांनी ही योजना तीन वर्षापासून प्रलंबित ठेवली.त्यामुळे जामखेड शहर आणि उपनगरातील नागरीकांची पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात कुचंबना झाली. १२३ कोटी रूपये खर्चाची असलेली पाणीपुरवठा योजना तीन वर्ष प्रलंबीत ठेवल्यामुळे आज या योजनेचा खर्च २५० कोटी रूपयांवर गेला आहे.
कर्जत तालुक्यातील २२ दुष्काळी गावांना वरदान ठरणारी तुकाई उपसा सिंचन योजनेचे प्रत्यक्ष काम २ मार्च २०१९ रोजी सूरू झाले होते.मात्र याही योजनेचे काम केवळ श्रेयासाठी आ रोहित पवार यांनी तीन वर्ष बंद ठेवल्याचे आमदार शिंदे यांनी सांगून, तुकाई अपसा सिंचन योजनेचे काम सूरू करणेबाबत तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. कर्जत जामखेड तालुक्याच्या दृष्टीने या दोन्ही महत्वाकांक्षी योजनांचे काम मार्गी लागल्यामुळे जनतेला खूप मोठा दिलासा मिळाल्याचे आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर , सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी,राजेंद्र देशपांडे, मनोज कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, भाजपाचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, शिवकुमार डोंगरे, नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे, संदीप गायकवाड, गणेश आजबे , शाकीर खान, सलीम बागवान , संतोष गव्हाळे ,अण्णा ढवळे, प्रवीण सानप , प्रवीण बोलभट, तात्याराम पोकळे , डाॅ.अल्ताफ शेख मोहन गडदे, मोहन देवकाते ,गोरख धनवट श्रीराम डोके, महेश मासाळ नितीन धनवटे, ऋषिकेश मोरे, सुनील यादव, विक्रांत घायतडक, तुषार बोथरा, बाळासाहेब गायकवाड विठ्ठल राळेभात, राहुल राऊत, डॉ. अनभूले , घायतडक, दिपक महाराज गायकवाड, संतोष राळेभात, आबु पवार,सजय वाघमोडे, प्रसिद्धीप्रमुख उद्धव हुलगुंडे, सलीम तांबोळी ,बाबासाहेब फुलमाळी हे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी दंडवते यांच्या बदलीचे निर्देश, कारभाराची चौकशी होणार –
जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली करण्याचे निर्देश देतानाच, नगर परिषद प्रशासक म्हणून दंडवते यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले.