पुणे – देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध पावलं उचलण्यात येत आहेत. अशातच महाराष्ट्रामध्ये देखील कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले असून कोरोनाला परतवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवित असून त्यांच्या प्रयत्नांना यश देखील येताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर जनतेशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनाबाधित ५ रुग्ण ठणठणीत झाल्याची सुवार्ता दिली होती. तसेच कोरोनाशी युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला घरात बसून लढाई जिंकायची आहे असे देखील सांगितले होते.
दरम्यान, राज्यातील ५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून व्यक्त होताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपाययोजना यशस्वी होत असल्याची पोचपावती देत ते म्हणतात, “मुख्यमंत्री म्हणून आपण करत असलेल्या उपाययोजना यशस्वी होत आहेत.”
‘राज्यातील ५ बाधित बरे झाल्याने कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही हे स्पष्ट होते. मात्र सर्वानी आवश्यक काळजी घ्यावी.’ असं मत देखील त्यांनी ट्विटद्वारे मांडलं आहे.
अभिनंदन मुख्यमंत्री @OfficeofUT जी साहेब! मुख्यमंत्री म्हणून आपण करत असलेल्या उपाययोजना यशस्वी होत आहेत.
तसेच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही हे यावरून स्पष्ट होतं मात्र प्रत्येकाने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याची नितांत गरज आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. https://t.co/psixnBraF5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2020