जामखेड – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली.
करोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला.शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आ. पवार यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.
मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बॅंकांची असलेली कमी संख्या. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिकांना संघटीत बॅंकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे, यासाठी आ. पवार प्रयत्नशील आहेत. केंद्राच्या अखत्यारीत असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी आ. पवार यांनी अर्थमंत्री सीतारामन यांची भेट घेऊन विनंती केली.
शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बॅंकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बॅंकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिल्याचे आ. पवार यांनी सांगितले.
आ. पवार यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारितामंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजनेत अहमदनगर जिल्हा समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले. तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आ. पवार यांनी भेट घेऊन युएसटीटीएडी च्या अंमलबजावणीसाठी कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना आ.पवार यांनी निवेदनाद्वारे केली. याचसोबत अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची कर्जत – जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.