कोलकाता -आयपीएल स्पर्धेत अनेक दिग्गज फलंदाज आहेत की जे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजी उद्ध्वस्त करू शकतात. ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डीविलियर्स असे फलंदाज या स्पर्धेत खेळत असूनही मी जोपर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होतो तोपर्यंत मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माविरुद्धच प्लॅन तयार करण्यावर भर द्यायचो, असे गौतम गंभीरने सांगितले.
जागतिक क्रिकेटमध्ये डीविलियर्स, कोहली किंवा गेलसारखे स्फोटक फलंदाज असतानाही या सगळ्यांपेक्षा जास्त धोकादायक फलंदाज रोहित आहे. त्याला रोखले तर संपूर्ण संघ निचांकी धावांत गुंडाळणे शक्य होते. मात्र, रोहित खेळपट्टीवर किमान 10 षटके जरी टीकला तरीही तो समोरच्या संघाचे सगळे प्लॅन अपयशी ठरवू शकतो.
मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी संघाची जेव्हा बैठक व्हायची तेव्हा सगळेच रोहितवरच लक्ष केंद्रीत करायचे. त्याला लवकर कसे बाद करता येईल, यावरच आराखडे तयार करायचे. काहीवेळा त्यात यश आले. मात्र, दरवेळी रोहितच या सगळ्या प्लॅनवर भारी ठरत असे, असेही गंभीरने सांगितले.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व इयान मॉर्गनकडे आहे. मॉर्गनला अजुनपर्यंत एकदाही कोलकाता संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. तर माजी कर्णधार गौतम गंभीरने या संघाला 2 वेळा विजेतेपद मिळवून दिले होते. सध्या तो या स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहे.