नवी दिल्ली – दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेल्या हल्लेखोरांकडून कारागृहात असणारा गॅंगस्टर टिल्लू ताजपुरीया याला क्षणाक्षणाची बित्तंबातमी इंटरेट कॉलद्वारे मिळत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तिहार कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची दूर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे.
टिल्लू हा तिहारमधील मंडोला कारागृहात आहे. गोळीबार करण्यापुर्वी तो मिनिटा मिनिटाला हल्लेखोरांकडून माहिती घेत होता. या गोळीबारात टिल्लूचा प्रतिस्पर्धी जितेंदर उर्फ गोगी याची हत्या झाली होती. तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर मरण पावले होते.
रोहिणी न्यायालयापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल.
सध्या कोठे पोहोचले आहेत अशा स्वरूपाचे तो प्रश्न विचारत होता. त्यानंतर टिल्लूने निनय आणि उमंग यादव या हल्लेखोरांशी संपर्क साधून रोहीणी न्यायलयात उपस्थित रहायला सांगितले. तसेच परिस्थितीची माहिती देण्यास फर्मावले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगदी गोळीबार करण्याच्या आधी काही क्षण त्याने फोन करून ते दोघे हल्लेखोर कोठे आहेत, याची खातरजमा केली होती.
हल्लेखोर न्यायालयात बसले आहेत. न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेरही प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. त्यावेळी तेथून निसटून जाणे अशक्य असल्याची जाणीव टिल्लूला झाली. त्यानंतर त्याने विनय आणि उमंग यांना पुन्हा फोन केला. ते कोठे आहेत, याची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी पार्किंगमध्ये असल्याचे सांगितले त्यावेळी टिल्लूने त्यांना पळुन जाण्यास सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले.