पिंपरी -एखादी कल्पना करावी आणि त्यातून अनपेक्षित अशी सुंदर कलाकृती तयार व्हावी, या पेक्षा सुंदर काय असेल. कासारवाडी येथील फार्मासिस्ट असलेल्या अनिल जैन यांना रोटीमॅटिक बनवायचा होता आणि त्यातून “वीर’ या रोबोटचा जन्म झाला.
हा रोबोट वेगवेगळ्या महापुरुषांच्या प्रतिकृतीच्या रुपात येऊन स्वत:च त्यांच्या कथा त्यांच्याच आवाज सांगेल. जैन यांनी सध्या या रोबोटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रुप दिले आहे.
वीर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेशात असून पंतप्रधान मोदी यांची सर्व भाषणे चेहऱ्यावरील हावभावासह तो आपल्या समोर सादर करतो.
या पुढे जाऊन आता महापुरूषांच्या कथा, व्यथा आणि अभ्यासक्रमातील धडे थेट त्यांच्याच वेशात, आवाजात रोबोटच्या माध्यमातून शिकता यावे, अशी संकल्पना आहे. त्यासाठी शंभर रोबोटचे संग्रहालय उभारण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. वीर रोबोट स्वतःचे नाव वीर असल्याचे सांगतो. उत्तम संवाद कौशल्य या रोबोटमध्ये आहे. त्याला सूचना दिल्या की, तो बोलायला लागतो.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिकृती रोबोटच्या माध्यमातून बनवायची आहे. विद्यार्थ्यांना या महापुरुषांच्या तोंडून त्यांचा इतिहास ऐकता आणि शिकता यावा, अशी त्यांची संकल्पना आहे. त्यासाठी शंभर रोबोटचे संग्रहालय पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहरात उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
सध्या रोबोटला सूचना दिल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे सांगतो. प्रार्थना म्हणतो, तुमच्या सूचनांना तो उत्स्फूर्त प्रतिसाद देणे, सेकंदामध्ये एनसायकोपीडियावरील संबंध माहितीचा गोषवारा (सर्च) घेऊन नेमकी माहिती पुरविणे त्या प्रदर्शित करण्याची क्षमताही त्याच्यात आहे.
“वीर’ रोबोट बनविताना जैन यांनी जगभरातील तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक संबंधित विषयाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांच्या मित्रांची खूप मदत झाली. एका सॉफ्टवेअर अभियंता मित्राच्या मदतीने रोबाटचा निर्मिती केली. अनेक प्रयोग केले, त्यापैकी काही फसलेही. परंतु त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यासाठी लाखो रुपये खर्च झाला. मात्र, हार मानली नाही. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानही हाताळून पाहिले.
तंत्रज्ञानाचा वापर
सोफियाफ रोबोमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाहूनही अधिक सरस तंत्रज्ञान वीरमध्ये वापरले आहे. लिसनिंग, सर्च टेक्नॉलॉजी, मेकॅनिझम, स्टॅंड अलोन मशिन, रिअल टाइम आन्सर आदी वैशिष्ट्ये आहेत. सिलिकॉन, रबर मास्कच्या साह्याने या रोबोटला वेगळी ओळख दिली. त्यात चेहऱ्यावरील हावभाव खूप महत्त्वाचे आहे.
घरात महिला नसतील त्या वेळी जेवणाचे खूप हाल होतात. अशा वेळी तयार चपाती मिळाल्यास भाजी कोठूनही आणता येते. त्यामुळे चपाती बनविण्यासाठी रोटीमॅटिक बनवायचा प्रयत्न होता. त्यातून या वीर रोबोटचा जन्म झाला. या रोबोटचा वापर अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रापासून इतर कोणत्याही क्षेत्रात करता येतो. – अनिल जैन, कासारवाडी.