नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रोबर्ट वाड्रा यांनी देशातील जनता असुरक्षित आहे असे म्हटले आहे. हे सांगत असताना त्यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेशीच तडजोड होत असल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये देशातील परिस्थितीवर वक्तव्य केले आहे. यात त्यांनी हा प्रश्न केवळ प्रियांका, माझी मुलगी किंवा मुलगा अथवा गांधी परिवाराच्या सुरक्षेचा नाही. हा प्रश्न आपले नागरिक, विशेषत्वाने आपल्या देशाच्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचा आणि सुरक्षित वाटण्याबाबतचा आहे. संपूर्ण देशातच सध्या सुरक्षेशी खेळ केला जात आहे. मुलींसोबत छेडछाड, दुष्कृत्यांचे प्रमाण वाढले आहे. आपण कुठल्या प्रकारचा समाज बनत चाललो आहोत. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. जर आपण आपल्या देशात आणि घरातच सुरक्षित नाही. रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा किंवा रात्रीही सुरक्षित नाही. तर आपण कुठे आणि कशा प्रकारे सुरक्षित राहू शकतो?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा हटकवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सात अज्ञात व्यक्ती कसलीही परवानगी नसताना एका वाहनाने प्रियांका गांधी यांच्या लोधी इस्टेट येथील घराच्या आवारात घुसले. यामध्ये तीन पुरुष, तीन महिला आणि एका मुलीचा समावेश होता.
हे लोक प्रियांका गांधी यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करीत होते. प्रियांका यांनी त्यांच्यासोबत शिष्टाचाराने चर्चा केली. त्यानंतर या लोकांनी प्रियांका यांच्यासोबत फोटो घेतले आणि ते निघून गेले. या घटनेनंतर प्रियांका गांधींच्या कार्यालयाने हा प्रश्न सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला होता. एसपीजी सुरक्षा हटवल्यानंतर प्रियांका यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.