जांबुत (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर (robbery in Bank of Maharashtra) भरदिवसा दुपारी 1.30 च्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळीने रिवॉल्वर लावून 2 कोटी रूपयांचे सोने आणि 31 लाख रूपये रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहक देखील उपस्थित होता. अचानक दिड वाजेच्या दरम्यान सफेद कलरच्या सियाज कारमधुन आलेले पाच जन गाडीतुन उतरुन बॅकेत शिरले .एक जण दरवाजा मध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले .
त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकर च्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन सफेद रंगाच्या कार गाडी मधून पलायन केले. या गाडीवर प्रेस चा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.
पिंपरखेड पासुन शिरूर पोलिस स्टेशन सुमारे 45 किमी अंतरावर आहे घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले . पुणे व नगर जिल्ह्यांची नाका बंदी करण्यांची सुचना देण्यात आली असुन पोलिस पुढील तपास करीत आहेत मात्र या परीसरात दिवसा प्रथमच दरोडा पडला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .या भागात अनेक वित्तीय संस्था व बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
या परिसरात ला शिरूर पोलीस स्टेशन खूप दूरवर पडत असून टाकळी हाजी येथे नव्याने पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे मात्र हा प्रस्ताव कधी मंजूर होणार याची प्रतीक्षा जनतेला लागली आहे . गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे याबाबत वेळोवेळी मागणीही करण्यात आली आहे .या भागात चोऱ्या ,दरोडे या घटना घडत असुन अवैध धंद्यांना ही ऊत आल्याने सामान्य जनतेचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे . टाकळी हाजी येथेही दोन दिवसापुर्वी चार दुकाने चोरांनी फोडली . त्यामुळे स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज निर्माण झाली आहे .