पुणे(प्रतिनिधी) – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनचालकांना धमकावून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांकडून तीक्ष्ण हत्यारे व मोबाईल असा 36 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
आकाश भरत थोरात (24 ), सचिन अप्पा रणदिवे (22 ), ओंकार भाऊसाहेब रणदिवे (22 , तिघे रा. आंबेगाव खुर्द, कात्रज), तुषार आनंदा दुधाणे (20 ), तनिष्क संतोष सोनवणे (18 , रा. आगम मंदिर परिसर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बाह्यवळण मार्गावर तपास पथकातील कर्मचारी शंकर कुंभार, जगदीश खेडेकर गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला चार ते पाचजण शस्त्र घेऊन थांबले असल्याची खबर मिळाली . हे आरोपी तेथून जाणाऱ्या वाहनचालकांना थांबवून लुटण्याच्या तयारीत होते. खबर मिळताच पोलिसांनी सापळा लावून पाच आरोपींना पकडले. त्यांच्याकडून दोन कोयते, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार श्रीधर पाटील, गणेश सुतार, राजु वेगरे, निलेश खोमणे, प्रणव संकपाळ, समीर बागसिराज, हर्षल शिंदे, प्रदिप शिंदे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली.