केतकावळे – पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौफूला येथील हॉटेल महाराजामध्ये गुरुवारी (दि. 27) रोजी रात्री 9 च्या सुमारास 5 ते 6 अनोळखी व्यक्तींनी लोखंडी कोयत्याने कामगारांना मारून दहशत पसरवून दरोडा घालणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही व पैशांची चणचण भासू लागल्याने हा दरोडा घालण्यात आल्याचे आरोपींनी मान्य केले आहे.
सागर उर्फ नानूभाई बबलू नाथु (वय 19), अनिल उर्फ जग्गू प्रमोद सोळंकी (वय 20), सनी भरत पवार (वय 20), विकास उर्फ तर्री जितेंद्र मंडले (वय 20, सर्व रा. सासवड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सागर नानासाहेब उरसळ (रा. सिंगापूर, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली होती.
या घटनेत हॉटेलमधील कामगार प्रशांत वसंत बगाडे व प्रथमेश फडतरे यांना कोयत्याने मारहाण करून हॉटेलच्या काउंटरमधून 16 हजार 700 रूपये रक्कम तसेच दशरथ वाघमारे व गणेश मंगळवेढेकर यांचा मोबाइल हिसकावून घेवून 23 हजार 700 चा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता.
या घटनेच्या तपासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार श्रीकांत माळी, हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनषिव, पोलीस नाईक राजु मोमीन, गुरू जाधव, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अमोल शेडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाला नियुक्त केले होते. या पथकाला तपास करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत हा गुन्हा सागर उर्फ नानूभाई नाथू व त्याच्या साथिदारांनी केलेला आहे तसेच तो व त्याचे साथीदार हे सासवड येथील खंडोबानगर येथे एकत्रीत जमलेले आहे, अशी माहीती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने खंडोबानगर येथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता सागरकडे गुन्ह्यात चोरलेला मोबाइल मिळून आला. तसेच हा गुन्हा त्याने त्याच्या फरार साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना सासवड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सहायक निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.
- स्थानिक पोलिसांना माहिती कशी मिळत नाही?
ऐन गणेशोत्सवाच्या काळात एवढी मोठी घटना होवूनही पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी हे सासवड पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. असे असताना गणेशोत्सवाच्या काळात हे गुन्हेगार तडीपार का करण्यात आले नाहीत ? जर आरोपी तडीपार असतील तर केवळ कागदोपत्री आहेत का? गंभीर गुन्हे असलेले आरोपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुले आमपणे वावरत असताना पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळते; परंतु स्थानिक पोलिसांना याची माहिती का मिळू शकत नाही? या गोष्टींचाही तपास होण्याची गरज आहे.