स्थानिकांसह प्रवाशांना पडला प्रश्न : वाहतूककोंडी झाली नित्याचीच
शिंदे वासुली- चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसह पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव ते चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर कंटेनर, ट्रेलर, कंपन्यांच्या बस व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको, सिक्स सिटर गाड्या, चौका चौकात रस्त्याच्या कडेला उभी केलेली भाड्यावर देण्यात येणारी टेम्पो, पिकअप,छोटाहत्ती सारखी किरकोळ व अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग होत असल्याने येथे अपघातांची शक्यता वाढली आहे. तर नित्याच्या होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे स्थानिकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. तरी बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चाकणमध्ये मोठी औद्योगिक वसाहत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची संख्या मोठी आहे. येथील एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांसह या भागातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. एमआयडीसी भागातील लहान मोठ्या कंपन्या, गोदामे सुरू आहेत तर काही ठिकाणी नवीन कंपन्या उभारण्यात येत आहेत.
बहुतेक कंपन्यांत कच्चा माल घेऊन येणारी वाहने या कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर उभी केली जातात. यापैकी काही वाहनचालकांना तर आत कंपनीत जागा नाही, असे सांगून दोन-तीन दिवस बाहेर ठेवले जाते. त्यामुळे अन्य राज्यांतून आलेले वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने ठेवतात. काही ठिकाणी रस्ता जरी मोठा असला तरी निम्म्या रस्त्यापर्यंत वाहने उभी असल्याने हा रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे. रात्रीच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर वेगात येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्याकडेला पार्किंग केलेल्या अवजड वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत असतात. एमआयडीसीत येणाऱ्या वाहनांची रस्त्यावरील अवैध पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसीने अवजड वाहनांना ठिकठिकाणी कायमस्वरुपी पार्किंग स्थळ निर्माण करण्याची गरज आहे.
- वाहनतळच अस्तित्वात नाही
वासुली फाटा परिसर, जीई कंपनी चौक, हॅंडसमन कंपनी चौक, एचपी चौक, वराळे येथील महिंद्रा कंपनीसमोर, शिंदे येथील न्यु हॉलंड कंपनी किंवा प्रॉटॉन कंपनी शेजारी, तसेच बहुतांश कंपन्यांच्या पुढे तर कामगारांच्या दुचाकी, चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीत वाहनतळ अस्तित्वात नसल्याने भर वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने पार्किंग केली जात आहे. खराब आणि अरुंद रस्ते, त्यात दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूककोंडीची तर नित्याची झाली असून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. - औद्योगिक वसाहत विकसित होत असताना दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर रुप घेईल. कंपन्यांचे कच्चा पक्का माल वाहतूक गाड्या, कामगार वाहतूक करणाऱ्या बसेस, प्रत्येक चौकातील पॅसिंजर गाड्या, उद्योजक व परिसरातील स्थानिकांच्या काय, दुचाकी यांना वाहनतळ नाही. त्यामुळे एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी वाहनतळ होण्याची गरज आहे. यासाठी एमआयडीसीने निर्णय घेतला पाहिजे.
सुरेश पिंगळे देशमुख – उद्योजक, सायली इंटर प्रायझेस