मनपा अभियंत्याच्या संकल्पना, मेहनतीचे मिळतेय फळ…
तीन वर्षांत लाखो लिटर पाणी भूर्गभात ः उपक्रम आता शहरभर राबविणार
सुनील राऊत
पुणे – विकासकामांमुळे बेसुमार कॉंक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण घटले आहे. हा जलसाठा वाढविण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने पुढाकार घेतला आहे. पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरविण्यासाठी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे.
हा उपक्रम शहरासाठी संजीवनी ठरणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्याने तो लवकरच संपूर्ण शहरासाठी राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात पर्यावरणपूरक रस्त्यांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी नव्याने रस्त्यांवर “रेन वॉटर रिचार्ज स्पीट’ विकसित केले आहेत. त्यातून गेल्या तीन वर्षांत लाखो लिटर पाणी भूर्गभात जिरविण्यात आले आहे.
असा आहे उपक्रम
पथ विभागाने जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, राजभवन रस्ता तसेच नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या सूस पाषाण रस्त्यावर ही रेन वॉटर रिचार्ज स्पीट संकल्पना राबविली आहे. त्याअंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला 250 मीटर अंतरावर पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्या बाजूला पदपथावर दोन मीटर बाय दोन मीटर चौकोनी खड्डा केला जातो. त्यात, पारंपरिक पद्धतीचा शोषखड्डयांचा “फिल्टर मीडिया’ केला जातो. या खड्ड्यांमध्ये बोअरवेल असते. त्या बोअरवेलवर स्टेनलेस स्टीलचा स्ट्रेनर लावला जातो. या खड्डयांमध्ये शेजारील पावसाळी वाहिनीतून पाणी वाहून येण्यासाठी 12 इंच पाइप लावला जातो.
तर, पाइप पावसाळी लाइनमध्ये थोडा उंचीवर लावला जातो. त्यामुळे गाळ पाइपमध्ये न येता पाणी येते. नंतर हे पाणी शोषखड्ड्यात फिल्टर होऊन थेट बोअरवेलमध्ये जाते. हे पाणी थेट भूगर्भात पोहचून पाणीपातळी वाढण्यास मदत होते. आतापर्यंत या चार रस्त्यांवर पालिकेने 15 स्पीट उभी केली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
पर्यावरण संवर्धन
गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाचा फायदा होत असल्याने प्रशासन हा प्रकल्प शहर पातळीवर राबवणार आहे. त्याबाबत पथ विभागाने प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. प्रकल्पामुळे शहरात एकाच वेळी लाखो लिटर पाणी जमिनीत मुरवणे शक्य होणार असून, शहराच्या पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पथ विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहोत. याचे चांगले परिणाम दिसून येत असून, जलसंवर्धनास मदत होत आहे. या उपक्रमामुळे किती पाणी भूगर्भात गेले याचा अभ्यास करण्यात येत आहे. या स्पीट्समुळे बोअरवेलचे पाणी वाढल्यास त्याचा वापर संबंधित रस्त्यावरील झाडांसाठी करता येईल का, याची चाचपणीही करण्यात येत आहे.
– दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग