पुरंदर – तालुक्यात दीड महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश ग्रामीण भागातील गावांना जोडणारे साकव पूल महापुरामुळे वाहून गेले. या पुलांना कठडे राहिलेले नाहीत, त्यामुळे या पुलांवरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.
नदीकाठच्या गावांतील डांबरी रस्ते पूर्णतः वाहून गेले असल्यामुळे सध्या ग्रामीण भागात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नारायणपूर, भिवडी, सासवड, एकखतपूर,मुंजवडी, कुंभारवळण, कोथळे, बेलसर, मावडीसुपे या गावांतील अनेक पूल वाहून गेले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. शासकीय पातळीवर याबाबत मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष
द्यायला हवे.
पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर पवारवाडीजवळील पूल वाहून गेला आहे. याबाबत दीड महिना होऊनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाह, यामुळे या महामार्गावरून रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कऱ्हा नदीवरील पुलाची तात्पुरती डागडुजी केली आहे. मात्र, तो कधीही खचू शकतो, याकडेही प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तहसील कार्यालयाकडे जाणारा कऱ्हा नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता, त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुलावर रात्रीच्या वेळी वाहनांचा अंदाज चुकतो, त्यामुळे मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.
एकंदरीतच महापुरामुळे पुरंदर तालुक्यातील ज्या गावातील रस्ते, पूल, बंधारे यांचे नुकसान झाले आहे, त्यांची डागडुजी -दुरुस्ती आणि नवीन रस्ते त्वरीत तयार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरंदर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तातडीने बैठक घेऊन रस्ते पूल यांचे नुकसानीचे ऑडिट करायला हवे आणि त्याचा एकंदरीत नुकसानीचा अंदाज, देखभालीचा खर्च यांच्या निधीची व्यवस्था करण्याकरिता पाठपुरावा करणे आवश्यक आहे.