निवेदनांना केराची टोपली
पाण्याची वानवा निर्माण झाल्याने नगरसेवक धनंजय जांभळे यांनी नगरपालिकाकडे वारंवार लेखी निवेदने देऊन आणि तोंडी तक्रारी करूनही या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली. परिणामी नगरपालिका पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहून आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यामुळेच नगरपालिकेच्या विरोधात तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सातारा – येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या तुळजाभवानी कॉम्प्लेक्स समोर 4 दिवस नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. याबाबत आंदोलकांनी दिलेली माहिती अशी की, तुळजाभवानी कॉम्प्लेक्स, साई हेरिटेज, साई प्रेस्टिज, गोल मारुती मंदिर परिसर बोकील बोळ, कोल्हटकर आळी या परिसराला नगरपालिकेच्या माध्यमातून पहाटे 5.15 आणि 7.15 अशा दोन घंटेवारीत पाणी सोडले जाते. मात्र गेल्या चार दिवसापासून या परिसरात पाणी न सोडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
पाडव्याच्या सणाच्या दिवशीही येथील नागरिकांना पाण्याची उसनवार करावी लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक आणि महिलांनी आज सकाळी 8 ते 9 या वेळेत राजवाडा परिसरात असणाऱ्या तुळजाभवानी कॉम्प्लेक्स समोर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर तब्बल एक तासाने उशिरा पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याने समवेत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. श्रीकांत आंबेकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.