नवी दिल्ली – चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंमुळे क्रीडा क्षेत्राला चांगलाच फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोड सेफ्टी सिरीज क्रिकेट स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली आहे. आयोजकांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही स्पर्धा व त्यातील पुण्यात होणारे सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये प्रेक्षक स्टॅण्ड रिकामे ठेवूनच खेळविण्यात येणार होते. करोना प्रसार आणि राज्यातही त्याचे रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता 14 ते 20 मार्च या कालावधीत रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे सामने पाहण्याची प्रेक्षकांची संधी हुकणार आहे. ज्या क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेतील सामन्यांची तिकिटे घेतलेली आहेत, त्यांना पैसे परत केले जाणार आहेत.
याचसोबत २९ मार्चपासून सुरु होत असलेली आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने पुढे ढकलली असून आता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.तसेच, दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा देखील करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील उर्वरीत सामने 15 मार्च आणि 18 मार्च रोजी अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे होणार होते.
दरम्यान, करोनाचा प्रसार अनेक देशांत झालेला आहे. सध्या भारतात करोना विषाणूचे अनेक रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत.