वाहनचालकांमधून नाराजी ः सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
शिंदे वासुली – चाकण ते भांबोली फाटा ते करंजविहीरे रस्त्याचे हायब्रीड ऍम्थुनिटी कार्यक्रमांतर्गत विस्तारीकरण व नूतनीकरणाच्या कामामुळे प्रवासी व वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची अवस्था “आगीतून निघून फुफाट्यात पडल्या’ सारखी झाली आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांमधून नाराजी चा सूर उमटत आहे.
चाकण ते भांबोली फाटापर्यंतच्या रस्त्याचे काम गेले कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. ते काम आणखीन सहा ते सात महिने चालणार आहे. काम संथगतीने होण्यामागे बांधकाम विभाग किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते बांधकाम विभाग प्रशासन झोपले आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्त्याच्या कामात अनियमितता आणि प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेची कोणतीही काळजी कामात घेतली जात नसल्याने नागरिकांना अपघातांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी वराळे गावच्या हद्दीत एका बाजूला मुरुमाचे ढीग आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला भराव केल्याने अरुंद रस्ता झाला होता. या कामामुळे एक मालवाहतूक ट्रक रस्ता सोडून रस्त्याच्या लगत गटारात पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही.
दरम्यान, आंबेठाण ते कोरेगाव फाटा हा रस्ता खराब व वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचा असल्याने तो रस्ता तयार करावा. तसेच रस्त्याचे काम सुरू असेल तर या ठिकाणी वाहतूक नियमन व सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी आंबेठाण ते कोरेगाव फाटा परिसरातील मागणी नागरिकांनी केली आहे.
कंत्राटदाराकडून स्वच्छंदी कामे चालू
कंत्राटदार वाटेल तसे आणि वाटेल तिथे काम करत आहे. कुठेही रस्ता खोदणे, तर दुसरीकडेच मुरुमाचा भराव करणे किंवा चांगल्या दर्जाच्या रस्त्यावर मुरुमाचे ढीग टाकणे अशी स्वच्छंदी कामे सुरू आहेत. यावरून कंत्राटदाराला अधिकाऱ्यांचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कुठेही रस्त्यावर वाहतूक नियमन व सुरक्षेची काहीही काळजी व जबाबदारी घेतलेली दिसून येत नाही.