पुणे – सीमा भागात रस्ते बांधणी करण्यासाठी आता पर्यावरणपूरक साधनांच्या वापरावर भर दिला जाणार आहे. याच अनुषंगाने लवकरच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ)कडून प्लॅस्टिकचा वापर करून रस्ते निर्मिती केली जाणार असल्याचे बीआरओ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील बीआरओ संस्थेकडून जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत, अरुणाचल प्रदेश अशा विविध प्रदेशांमधील सीमाभागात रस्त्यांची बांधणी केली जाते. सीमाभागातील अनेक रस्ते हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांमधून जातात. त्यामुळे अशाठिकाणी रस्त्यांची निर्मिती करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
काही ठिकाणी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाकडून रस्तेबांधणीसाठी काही घटकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठीच पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून रस्तेनिर्मिती करण्याचा प्रयत्न बीआरओकडून केला जाणार आहे.