राजगुरुनगर (प्रतिनिधी) – राजगुरुनगर शहरात करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.पोलिसांकडून कडक तपासणी केली जात आहे.
पुण्याच्या जवळ असलेल्या राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी शहराला सर्वाधिक करोना विषाणूचा धोका मोठा आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून गंभीर दखल घेत लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे.
नागरिक शहरात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ये-जा करीत असल्याने पोलिसांनी आता कडक भूमिका घेत शहरात बाहेरून येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. दुपारी एक नंतर शहरात येणाऱ्या भीमा नदीवरील पुलावर नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या या एकमेव मार्गावर आता पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व पेट्रोलपंप धारकांची बैठक घेऊन तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, तहसीलदार यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना डिझेल, पेट्रोल देण्याच्या सूचना केल्याने अनावश्यक शहरात गावात घिरट्या घालणाऱ्यांना मज्जाव केला जात आहे.
राजगुरूनगर येथील खेड पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तिन्हेवाडी रोड, वाडा रोड आणि पुणे – नाशिक महामार्गावरून शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्या तीनही ठिकाणी नाकाबंदी सुरु करण्यात आली आहे. अनावश्यक कारणास्तव फिरणाऱ्या व्यक्तींच्या दुचाकी जप्त करण्यात येत आहेत. लॉकडाउनच्या काळात शहरात अनावश्यक फिरणाऱ्या जवळपास 130 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
राजगुरूनगर शहरावरील करोनाचे संकट टाळण्यासाठी पोलीस यंत्रनेने कडक भूमिका घेतली आहे. शहरात येण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला असून त्याच्यावर पोलिसांनी गस्त ठेवली आहे. पोलिसांची मोठी फौज येथे तैनात असून शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे. अनावश्यक फिरताना आढळल्यास कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी थांबावे. गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी.
-अरविंद चौधरी, पोलीस निरीक्षक खेड