ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण, तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
वाठार स्टेशन – वाठार स्टेशन गावातून जाणाऱ्या पोलादपूर-पंढरपूर या राज्यमार्गाचे काम ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यातच करण्यात आले होते. मात्र सध्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची पुन्हा जैसे थे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
पोलादपूर-पंढरपूर 139 क्रमांकाचा राज्य मार्ग वाठार स्टेशनमधून जातो. गेल्यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यातच रस्ता खराब झाल्यामुळे त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाच ते साडेपाच किलोमीटर अंतराचे रस्त्याचे काम मंजूर झाले. रस्त्याचे खडीकरण करण्यापूर्वी दोन पुलांची कामे पहिल्यांदा करण्यात आली. त्यापैकी खारा पूल व वाग्देव हायस्कूल जवळ असणारी छोटी मोरी (पूल) प्रथमत: करण्यात आले.
सदरच्या ठरल्या कामांमध्ये वाग्देव हायस्कूलजवळ असणाऱ्या मोरीचे काम व खाऱ्या पुलावर झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून त्याठिकाणी पूर्ण रस्ता खचला असून मोठे खड्डे पडले आहेत. या निकृष्ट रस्त्याबाबत विचारणा केली असता ठेकेदाराचे सुपरवायझर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या निकृष्ट झालेल्या रस्त्याकडे व खचलेल्या पुलाकडे लक्ष घालून तातडीने त्याची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थ व वाहतूकदार संघटनेकडून होत आहे.