केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचा 2018चा अहवाल प्रसिद्ध
रस्ते अपघातांत महाराष्ट्राचा 11 वा क्रमांक
– कल्याणी फडके
पुणे – वारंवार जनजागृती करुनदेखील वाहनचालकांच्या चुकाच अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने देशातील अपघातांचे प्रमाण 0.5 टक्क्याने अर्थात 2,134 ने वाढल्याने नागरिकच त्यांच्या अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने देशात सन 2017 मध्ये तब्बल
4 लाख 64 हजार 910 अपघात झाले होते. तर, सन 2018 मध्ये तब्बल 4 लाख 67 हजार 44 अपघात झाले होते.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून सन 2018 मध्ये भारतात झालेल्या अपघातांचा अहवाल मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सन 2017 आणि 2018 मध्ये सर्वांत जास्त अपघात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचे या अहवालामध्ये नमूद केले आहे. भारतामध्ये सन 2018 मध्ये सुमारे 66.5 टक्के अपघात अतिवेगामुळे होत आहेत, असे केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानुसार अतिवेगाने झालेल्या अपघातांमध्ये 36 पैकी महाराष्ट्राचा 11 वा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सन 2018 मध्ये 9,956 अपघात अतिवेगामुळे झाले आहेत. त्यापैकी 3,926 जणांचा मृत्यू आणि 8,683 जण जखमी झाले.
भारतात सन 2017 मधील तब्बल 70.4 टक्के अपघात अतिवेगामुळे झाले आहेत. यापैकी 66.7 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला असून, 72.8 टक्के नागरिक जखमी झाले आहेत. तर सन 2018 मधील 66.5 टक्के अपघातांना वाहनचालकांचा अतिवेग कारणीभूत ठरला आहे. त्यापैकी 64.4 टक्के नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे पडतेय महागात
देशामध्ये सन 2018 मध्ये 24 हजार 781 अपघात विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यामुळे झाले आहेत. तर सन 2017 मध्ये 29 हजार 148 अपघात झाले होते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. सन 2017 पेक्षा सन 2018 मध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याने होणाऱ्या अपघातांमध्ये 15 टक्क्यांनी घट झाली आहे. तर महाराष्ट्रात सन 2018 मध्ये 1084 अपघातांमध्ये 384 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 924 जण जखमी झाले आहेत. थोडे अंतर कापण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहन चालविले जाते. पर्यायाने हा “शॉर्टकट’ वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.