पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पुन्हा महागठबंधन मध्ये सामील होणार असतील तर आमचा त्याला आक्षेप असणार नाही असे प्रतिपादन बिहारच्या माजी मुख्यमंत्री व राजद नेत्या राबडीदेवी यांनी केले आहे. राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनीही नितीशकुमार यांच्या पक्षाला पुन्हा महागठबंधन मध्ये सामील करून घेण्याची सुचना केली आहे.
बिहार मध्ये सध्या मंत्रिमंडळातील समावेशावरून जेडीयुचे नेते नितीशकुमार आणि भाजप यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. भाजपने जेडीयुला केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एकच जागा देऊ केली होती. त्यामुळे जेडीयु नेत्यांना अपमानीत झाल्यासारखे वाटत आहे.त्यांनी ही जागा नाकारून आता आम्ही भाजपच्या मंत्रीमंडळात कदापिही सहभागी होणार नाही असे नितीशकुमार यांनी म्हटले होते.
भाजपच्या या कृतीला चोख उत्तर देताना निताशकुमार यांनीही बिहार मध्ये लगेच मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपला एकही जागा देऊ केली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचे लक्षात आल्यानंतर राजदने आता पुन्हा नितीशकुमार यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राजद आणि संयुक्त जनता दल यांचेच सरकार राज्यात सुरूवातीला सत्तेवर आले होते. पण जेडीयु आणि राजद यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे नितीशकुमार यांनी दोन वर्षांपुर्वी राजदची साथ सोडून भाजपशी संगत केली होती.