मुंबई -माझ्यावर संशय करण्याचा त्यांचा मूळ हेतू नसून सुशांतच्या विम्याच्या रकमेवरच त्यांचा डोळा असल्यानेच हा सर्व तक्रारींचा खटाटोप त्यांच्याकडून सुरू आहे, असे गंभीर आरोप रिया चक्रवर्तीने केले आहे.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी रियाची तब्बल साडेआठ तास चौकशी केली. या चौकशीत रियाने तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
माझे व सुशांतचे नातेच त्यांना मान्य नव्हते, पण सुशांतने कधीच माझ्याशी गैरवर्तन केले नाही व त्याने मैत्रीही कधी तोडली नाही. कुटुंबीयांचे मत सुशांतलाही मान्य नव्हते. त्यामुळेच त्याने त्याच्या कुटुंबीयांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणात मला अडकवले जात असल्याचे रियाने सांगितले.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी रियासह अन्य काही व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्डरिंगबाबत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीच्या फेरीत शनिवारी रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची आधीची व्यवस्थापक श्रृती मोदी यांचीही चौकशी करण्यात आली.