भिगवण – पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे आणि नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यातील सर्व तलाव बंधारे अद्याप कोरडेठाक असल्याने कालव्याद्वारे तलाव भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, भादलवाडी, पोंधवडी, शेटफळ हवेली, पळसदेव, कळस, तरंगवाडी या गावांमधील तलाव अद्याप कोरडेठाक असल्याने निरा आणि खडकवासला कालव्याद्वारे भरल्यास याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होऊन लाखो हेक्टर शेती ओलिताखालील येण्यास मदत होणार आहे.
इंदापूर तालुक्याच्या सर्वच भागांमध्ये यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक गावांना अद्यापही ट्रॅंकरद्वारे पाणी वाटप चालू आहे तर काही भागात चारा छावण्या सुरू आहेत. गतवर्षी पाण्याअभावी तालुक्यात राजकीय वातावरण तापले होते. वेळोवेळी मागणी करूनही तलाव भरले नसल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला, यंदाही तेच संकट टाळण्यासाठी नद्यांद्वारे वायाला जाणारे हक्काच्या पाण्याद्वारे लवकरात लवकर तलाव न भरल्यास भरल्यास पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी आशा आता शेतकरी व्यक्त करु लागला आहे.
पाणी कर्नाटकात पोहोचले तरी इंदापुरात नाही…
जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्याने नद्यांद्वारे पाणी कर्नाटकात पोहोचले. मात्र, जिल्ह्यातील तलावात पोहोचू शकत नाही. ही इंदापुरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे. हक्काच्या पाण्याचे जर योग्य नियोजन आताच झाले नाहीतर लवकरच पुन्हा पाण्यासाठी संघर्ष उभा राहील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.