राजगुरूनगर – चासकमान धरणातून 52 हजार क्युसेक वेगाने सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीमधील घाण वाहून गेल्याने भीमानदी स्वच्छ झाली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच नद्या स्वच्छ झाल्या आहेत; त्यांची स्वच्छता टिकवणे आता सर्वांच्या हातात आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वच नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या होत्या. त्यात शहरांमधील मोठ्या प्रमाणात सोडलेले सांडपाणी आणि त्यामुळे नदीची गटारगंगा झाली होती. गेली दहा वर्षे ही घाण कडेला का होईना साठून होती. जोराचा पाऊस पडत नसल्याने धरणातून कमी क्षमतेने विसर्ग केला जात होता. त्यामुळे नद्यांमधील घाण पूर्णतः वाहून जात नसल्याने नद्या पुन्हा दूषित व दुर्गंधीत राहत होत्या. अशा वातावरणात नदीच्या पाण्यावर मोठ्या पमाणात जलपर्णी साठली जात असल्याने त्यात भर पडली. यावर्षी गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस मागील 15 दिवसांपूर्वी पडला. या पावसामुळे सर्वच नद्यांना महापूर आले. धरणे भरल्याने धरणातून मोठ्या क्षमतेने विसर्ग खाली सोडण्यात आला. त्यामुळे एरवी पात्र धरून वाहणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदीतील आणि नदीच्या कडेला साठलेला कचरा, घाण पुराच्या पाण्यात वाहून गेली. पुणे जिल्ह्यातील नव्हे; तर राज्यातील बहुतेक नद्यांना महापूर आल्याने नद्यांची पात्रे आता स्वच्छ झाली आहेत. आता पाऊस उघडल्याने या नद्यांमधील खळखळणारे स्वच्छ आणि सुंदर पाणी, नदी पात्रातील स्वच्छता मनाला भावत आहे. मोठ्या पावसामुळे नद्यांना महापूर आले. सर्वच नद्यांची पात्र स्वच्छ झाली आहेत. जलपर्णी सारखी महाभयंकर वनस्पती वाहून गेली आहे. ती पुन्हा होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे.
स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा खर्च
केंद्र आणि राज्य शासनांकडून नद्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. गेली दोन-तीन वर्षे अनेक मोठ्या नगरपालिकांमध्ये हा उपक्रम सुरु होता. हा निधी मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात येत होता; मात्र नद्या स्वच्छ होत नव्हत्या. जलपर्णी आणि नद्यांची अवस्था आरोग्याला घातक बनली होती. शासनाची यावरील उपाय योजना तोकडी पडली; नव्हे ती यशस्वी पणे राबवता आली नाही. मात्र निसर्गाने चमत्कार केला गेली दहा वर्षे जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस मागील पंधरा दिवसांपूर्वी पडल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या स्वच्छ झाल्या आहेत.