अकल्पितपणे काही सामोरं यावं आणि आपण आनंदाने थक्क व्हावं, असं क्वचितच घडतं. आयुष्य, भावना, मन यांची किती गुंतागुंत असते ना! रिमझिमणारे क्षण कधी, तर कधी वादळाची घुसळण. आपण मात्र कधी भिजायचं तर कधी वाऱ्यासोबत भरकटत जायचं…
पत्तोंकी सरसराहट
कानोंमे कुछ इस तरहा फुसफुसाती रही
बरसों, जैसे कोई पंचम का सूर
फुलोंकी अंगडाईयॉं लेते लेते
हवामें घुलमील रहा हो।
जबसे मेरे अंदरकी कविता ने होश सम्हाला..
तबसे उसीकी नज्म गुनगुनाई है।
उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हेसुद्धा अनुभवच आहेत ना क्षणांचे. विरह, मिलन, वियोग यांचे प्रतिनिधी वाटतात मला हे ऋतू. विरहाचा उन्हाळा मनात मिलनाच्या धुंद सरी जपतो, तर पावसाळा मिलनानंतरचे सृजन. वसंतात फुलणारे बहावा, अमलताश आणि वैशाखाच्या शेवटी बहरणारा गुलमोहर बदलत्या ऋतूचे आणि घुमणाऱ्या परिवर्तन चक्राचे प्रतीक आहेत. वर्षा ऋतूचा सांगाती पाऊस मेघमल्हार गाताना, आज कुणीतरी यावे… ओळखीचे व्हावे…, असे म्हणतो. आपल्या सहस्त्र धारांनी धरतीला ऋतूस्नान करणारा हा पर्जन्यसखा… श्रावणात तिला शृंगारतो, तर शरद ऋतूमधली परिपक्वता चांदण्याच्या रूपाने मनाच्या आकाशात जागत राहते. कोजागरती म्हणून आपण आपल्याच या जाणिवांना हाकारत राहतो.
पूर्वी श्रावणात एक आदित्यराणूबाईची कथा वाचली जायची. त्यात दवंडीवाल्याला सांगितलं जायचं, करा रे… हाकारा पिटा रे डांगोरा आणि शोधून काढा विवेकाचे सार… आयुष्यात येणारे अनेक अनुभव हे निसर्गचक्राशी पर्यायाने ऋतूंशी जोडलेले असतात, असं मला वाटतं. श्रावणातली प्रसन्न सकाळ, वैशाखातले रणरणते ऊन, हिवाळ्यातली हुरहुर लावणारी कातर वेळ आपल्या आयुष्यात अनेक आठवणी रुजवून जाते. आपल्या संस्कृतीमधील सणवार, परंपरा आपल्या जीवनाशी निगडित आहेत त्या यामुळेच. आपले विचार मोकळे सोडले की मोकळ्या ढगांसारखे धावतात इकडेतिकडे. तसंच काहीसं होत जातं आणि मन पोचतं भुलाबाईच्या ठाणात. जिथं ती भुलाबाई शोधते आपल्यातच लपलेल्या आपल्या महादेवाला. दऱ्याखोऱ्यांतली रानजाई होऊन निसर्गाशी एकरूप होऊ पाहताना भुलाबाई गात राहते गाणी आपल्या स्वत्त्वाची, अस्तित्वाची अन् रचते भोंडला रानशेवंतीच्या फुलोऱ्यात.
स्त्री तिचं जग आपल्या स्वत:भोवती विणत राहते. आपल्या एकेक आठवणी, सल, आपली माया यांची मऊशार पिसं जोडून ती खोपा बांधते त्याच्यासोबतच्या क्षणांचा. तेच क्षण तिच्या जगण्याचं कारण आणि बळ असतात. स्त्री ज्याच्यावर जीव जडवते ती त्याच्या सुखासाठी कोणतेही दिव्य करून दाखवू शकते. आपल्या इतिहासात, पुराणकथांत अशी अनेक उदाहरणे आहेत. ही भोंडल्याची गाणी तिच्या त्याच सुखदुःखाचं लेणं लेवून सजतात. जी गाणी किंवा कवितांच्या रूपाने जन्म घेतात. कोणत्याही स्त्री कवयित्रीची कविता ही नकळत तिच्याच आयुष्याचे प्रतिबिंब असते. जी शरदाचे चांदणे सजवते, भुलाबाईला नटवते तिच शिशिराची पानगळ ही सोसते.
विरह, मिलन पुन्हा नव्याने विरह मिलन हे चक्र चालूच राहते. सृष्टी ही देखील स्त्री रूपच आहे ना! ऋतूमग्नमध्ये हेच चक्र मांडायचा मी प्रयत्न केला. स्त्री जाणिवां या काही फक्त प्रेम, विरह, माया किंवा तिच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या कथा नसतात, तर त्या तिच्या अस्तित्वाच्या, तिच्या जगण्याच्या, तिच्या “स्व’च्या कहाण्या असतात. झाडाचे, पोपटी नव्हाळी पांघरलेले पान जसे कालांतराने अनुभवांच्या छटा वागवत प्रगल्भ होत जाते अन् एक दिवस आपल्या देठापासून विलग होत पुढच्या प्रवासाला निघते. तसेच स्त्रीचे अनुभव असतात. इथे संदर्भ मृत्यूचा नाही तर पुन्हा रुजण्याचा असतो. स्त्री मन असेच असते. अनेक आयाम अनेक कप्पे वागवते. प्रत्येक कप्प्यात एक अबोल, अव्यक्त कहाणी लपवलेली असते. हेच सारे कप्पे रिकामे होतात हातात जेव्हा लेखणी हाती असते.
अशाच एका उद्ध्वस्त क्षणांत माझ्याही हातात लेखणी आली आणि ती रुजवणारा मेघही. मी लिहित सुटले आकारहिन, अर्थहिन… कधी एकच शब्द, कधी पसाऱ्याचं. आज अशी गत आहे की मी सचैल भिजतेय शब्दांमध्ये. मनाचे सारे सारे रिकामे करतेय. त्या संपवणाऱ्या आणि पुन्हा नव्याने मला जन्माला घालणाऱ्या क्षणाचे सृजन मांडतेय. आता फक्त जी शब्दांची साथ मिळालीय ती मला वादळातही कोलमडू देणार नाही.
ऋतू हा शब्द स्त्रीच्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगांनी, वेगवेगळ्या संदर्भांनी येतो. तिच्या सृजनात्मक होण्याचा सोहळा हा तिला ऋतू प्राप्त झाला या रुपकाने साजरा होतो. तिच्या ऋतुमती होण्यात तिच्यातल्या मातृत्वाचे बीज लपलेले असते. तिचे आईपण आणि तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या नवीन जीवाचे स्वागत, फलशोभन व डोहाळे जेवण करून साजरे होते. इतका ऋतू स्त्रीच्या आयुष्याशी एकरूप झालेला आहे. स्त्री या ऋतूंबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत जोडलेली राहते. असा हा ऋतू तिला तिचा मित्र, सखा, सांगाती या रूपात भेटणं हाही दैवयोगच. लहानपणीच्या साऱ्या आठवणी, प्रसंग, प्रेम, मैत्री, सहवेदना अशा भावना मी मांडायचा प्रयत्न केला. सदरचे लेख म्हणजे अनेक रंगांच्या आकारांच्या आठवणींची माळच जणू… जी दैवाने माझ्यासाठी गुंफली… हाच दैवयोग माझ्यासोबत कायम राहो ही अपेक्षा.
मनात
मानसी चिटणीस