मुंबई – माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला विलासरावांचे चिरंजीव आणि अभिनेता रितेश देशमुखने उत्तर दिले आहे. पियुष गोयल यांनी सोमवारी 26/11च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली होती. “26/11′ च्या मुंबई हल्ल्यानंतर ताज आणि ओबेरॉय हॉटेलची पहाणी करण्यासाठी गेलेल्या विलासराव देशमुख यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला बरोबर नेले होते. आपल्या मुलाला चित्रपटात काम मिळावे म्हणून ते धडपडत होते, अशी टीका गोयल यांनी सोमवारी एका कार्यक्रमात केली होती.
गोयल यांच्या टीकेला रितेश देशमुखनं ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत उत्तर दिले आहे. “माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम मिळावे म्हणून ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र, जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही थोडा उशीर केलात. सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं असते, असे रितेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विलासराव देशमुख यांच्याबरोबर रामगोपाल वर्मा आणि रितेश देशमुख हे दोघेही ताज हॉटेलची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विलासरावांवर प्रसिद्धी माध्यमांमधूनही टीका झाली होती.