Riteish Deshmukh: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका ६५ वर्षीय व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून सामान्य नागरिकांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यांनीही आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या रितेश यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. त्यांनी सांगितले की, अशा घटना घडतात तेव्हा खूप राग येतो. रितेश म्हणाले, “आपल्या राज्यात किंवा देशात अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा खूप वाईट वाटतं. आपण काहीच करू शकत नाही ही भावना अधिक त्रासदायक असते. पण अशा वेळी पोलिस, सरकार आणि न्यायव्यवस्थेने तातडीने कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, लवकर निर्णय घेतले गेले तर अशा गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल आणि अशा घटना कमी होतील. Riteish Deshmukh त्यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा वापर करून जलदगतीने निकाल देणे आवश्यक आहे. “कायद्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. आपल्या देशात संविधान आहे आणि त्यानुसारच कारवाई व्हायला हवी. जितक्या लवकर न्याय मिळेल तितकं समाजासाठी चांगलं,” असेही त्यांनी नमूद केले. रितेश यांना गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळात शिक्षा देण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, मात्र आजच्या काळात कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावे लागतात. त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, या घटनेवर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते शरद पोंक्षे, तसेच अक्षय केळकर आणि कश्मिरा कुलकर्णी यांनीही या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजासाठी मोठा धक्का आहे. अशा प्रकारच्या अमानुष कृत्यांवर कठोर आणि जलद कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. नागरिकांमध्येही भीती आणि संतापाचे वातावरण असून न्याय मिळावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.